नाशिकचे खरात प्रकरण: प्रबोधन परंपरेला धक्का:डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, 'हे लाजिरवाणे, काळीमा फासणारे'
![]()
ज्येष्ठ लेखक आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी नाशिकमधील खरात प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हे प्रकरण महाराष्ट्राच्या प्रबोधन परंपरेला काळीमा फासणारे असून, ज्यांनी ही परंपरा रुजवली, त्यांना शरमेने मान खाली घालावी लागेल, असे मत त्यांनी मांडले. मारुती प्रभाकर डोंगरे संचलित शिवप्रेमी, डोंगरे प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘प्रबोधन सभे’च्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. महाराष्ट्राला सर्व भोंदू बाबांपासून वाचवण्यासाठी आणि संतत्वाचा कलंक पुसण्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला अॅड. असीम सरोदे, डॉ. गीताली वि. मं., मिलिंद देशमुख, अॅड. रुपालीताई ठोंबरे पाटील आणि डोंगरे प्रतिष्ठानचे प्रमुख मारुती प्र. डोंगरे उपस्थित होते. डॉ. सबनीस म्हणाले की, अशोक खरातला ‘कॅप्टन’ संबोधणे तात्काळ थांबवले पाहिजे. ज्या राजकीय यंत्रणेने या भोंदूबाबाला पोसले, त्या यंत्रणेला जनतेने प्रश्न विचारणे आवश्यक आहे. या प्रकरणात सुमारे ३९ आमदारांची अनधिकृत नावे पुढे आली असून, असे लोक नेतृत्व करत असतील, तर महाराष्ट्राचे भवितव्य काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. हे प्रकरण म्हणजे संविधानाला अपेक्षित वैज्ञानिक दृष्टिकोन नाकारून स्वार्थासाठी संविधानाशी गद्दारी करणाऱ्या राजकारण्यांच्या निर्लज्जपणाची हद्द आहे, असेही ते म्हणाले. अॅड. असीम सरोदे यांनी सांगितले की, अशा भोंदू बाबांच्या प्रकरणांचे पितळ उघड पाडण्यात सामाजिक संस्था महत्त्वाची भूमिका बजावतात. केवळ कायदे करणे पुरेसे नसून, अशा भोंदूगिरीविरुद्ध सामाजिक जागृती होणे आवश्यक आहे. भारतीय समाजातील विविधतेमुळे संविधान कितपत झेपू शकेल, याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही शंका होती, मात्र ते आशावादी होते. सत्तेच्या लालसेपोटी अनामिका कापून घेतलेल्या ३९ आमदारांचे राजीनामे घेतले पाहिजेत, अशी मागणीही त्यांनी केली. डॉ. गीताली वि. मं. म्हणाल्या की, लैंगिक संबंध आणि सुख याविषयी मोकळेपणाने बोलले पाहिजे. ज्या महिलेवर बलात्कार होतो, ती घरातून बाहेरही निघू शकत नाही, मात्र बलात्कार करणारा उजळ माथ्याने फिरतो, हे चित्र बदलले पाहिजे. बलात्कार म्हणजे मानसिक, लैंगिक आणि भावनिक अपघात आहे. अपघातातून सावरण्यासाठी जशी मदत लागते, तशीच मदत बलात्कार झालेल्या महिलांना सावरण्यासाठी करणे आवश्यक आहे.
