मेळघाटाच्या खारी गावातील आगीत चार घरे जळून खाक:चार कुटुंबातील 20 जणांच्या निवाऱ्याचा प्रश्न समोर
![]()
धारणी तालुक्यातील खारी गावात शुक्रवारी ( दि.३) रात्री साडेदहा ते अकरा वाजताच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत चार घरे जळून खाक झाली आहेत. या घटनेत संसारोपयोगी साहित्यासह घरातील धान्यही जळून राख झाल्याने चारही कुटुंबांतील २० सदस्यांच्या वास्तव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शुक्रवारी रात्री अचानक खारी गावात आग लागली. काही समजण्यापूर्वीच आगीने रौद्र रूप धारण केले. या आगीत सुरेश जीवन घुले, युवराज प्रकाश धुर्वे, माया किशोर ताईड आणि शैलेश सुरेश घुले या चार नागरीकांची घरे पूर्णपणे भस्मसात झाली. घटनेची माहिती मिळताच धारणी नगर पंचायतीचे अग्निशमन वाहन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत आगीने सर्वस्व गिळंकृत केले होते. घटनेची माहिती मिळताच धारणीचे तहसीलदार प्रदीप शेवाळे यांनी तातडीने दखल घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक तलाठी यांनी घटनास्थळी पोहोचून नुकसानीचा पंचनामा केला. तसेच मदतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल पाठवण्यात आला आहे. धारणी आणि चिखलदरा तालुक्यात मागील काही दिवसांपासून आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यावर्षी जंगलापेक्षा मानवी वस्त्यांमध्ये आगी लागण्याचे प्रमाण अधिक दिसून येत आहे. या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी, कुडाच्या किंवा गवत आणि लाकडाच्या घरात राहणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. चार दिवसांपुर्वी घराला लागलेल्या आगीत वृद्धेचा झाला मृत्यू: चिखलदरा तालुक्यातील वाकी या गावात बुधवारी (दि. १) रात्री एका घराला आग लागली होती. या आगीमुळे घर पुर्णत: जळाले. याचवेळी घरात झोपलेल्या वृध्द महिलेचा जळाल्याने मृत्यू झाला होता. या घराशेजारी अन्य एका घरालासुध्दा आग लागली होती.
