इराण युद्धात मुंबईच्या दीक्षित सोलंकीचा बळी:पार्थिव मिळवण्यासाठी वृद्ध वडिलांची हायकोर्टात धाव; ओमानच्या किनाऱ्यावर गेला होता बळी
![]()
इराण विरुद्ध अमेरिका – इस्त्रायल युद्धाच्या झळा आता भारतालाही बसत आहेत. इराणच्या हल्ल्यात ओमानच्या समुद्र किनाऱ्यालगत मुंबईच्या दीक्षित सोलंकी नामक तरुणाचा बळी गेला आहे. या घटनेला महिना लोटला तरी दीक्षितचा मृतदेह अद्याप कुटुंबीयांना मिळाला नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी आता थेट मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, दीक्षित सोलंकी हे एमटी एमकेडी व्योम या तेल टँकरवर ऑयलर म्हणून कार्यरत होते. हे जहाज 1 मार्च 2026 रोजी ओमानच्या समुद्र किनाऱ्याजवळून जात होते. तेव्हा त्याच्यावर ड्रोन हल्ला झाला होता. या हल्ल्यामुळे इंजिन रुममध्ये मोठा स्फोट होऊन जहाजाला आग लागली. त्यात जहाजाचे मोठे नुकसान झाले. प्रारंभी या घटनेत दीक्षित सोलंकी बेपत्ता झाल्याचे सांगण्यात आले. पण दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह जहाजाच्या तुटलेल्या भागाजवळ आढळला. या हल्ल्यात जहाजावरील इतर 21 कर्मचारी सुखरुप आहेत. सोलंकी या युद्धात बळी पडलेले पहिले भारतीय ठरले. आपल्या याचिकेत काय म्हणाले पीडित कुटुंब? आज या घटनेला 1 महिना लोटला आहे. पण अद्याप दीक्षित सोलंकी यांचा मृतदेह भारतात आणण्यात आला नाही. त्यामुळे सोलंकी यांची बहीण मिताली सोलंकी व वडील अमृतलाल सोलंकी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आपल्या मुलाच्या मृतदेह लवकरात लवकर भारतात आणण्याची मागणी केली आहे. अमृतलाल सोलंकी आपल्या याचिकेत म्हणतात, माझा मुलगा दीक्षित सोलंकीचा 33 दिवसांपूर्वी मृत्यू झाला. त्याचा मृतदेह कधी येणार? याविषयी अधिकारी स्पष्ट उत्तर देत नाहीत. आम्हाला केवळ मृत्यूची बातमी दिली गेली. पण ही दुर्घटना कशी घडली त्याचे फोटो, व्हिडिओ किंवा तपास अहवाल काहीही देण्यात आला नाही. माझ्या मुलाला तिथे मरण्यासाठी सोडून दिले होते का? त्याला किती त्रास झाला असेल? असे विविध प्रश्न त्यांनी या प्रकरणी उपस्थित केलेत. दीक्षित सोलंकी यांचा मृतदेह मायदेशी परत आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने हस्तक्षेप करावा. त्यांच्या मृत्यूशी संबंधित सर्व न्यायवैद्यक पुरावे व तपास अहवाल कुटुंबाला सोपवण्यात यावेत. संबंधित शिपिंग कंपनी व मंत्रालयाने प्रस्तुत प्रकरणात झालेल्या विलंबाची जबाबदारी घ्यावी, अशी मागणीही त्यांनी या प्रकरणी परराष्ट्र मंत्रालय, बंदरे व जहाजबांधणी मंत्रालय आणि व्ही शिप्स इंडिया कंपनीला प्रतिवादी करताना म्हणालेत. याचिकेवर लवकरच होणार सुनावणी उल्लेखनीय बाब म्हणजे पश्चिम आशियातील लष्करी संघर्षामुळे सध्या त्या भागातील सागरी मार्ग असुरक्षित झालेत. या तणावामुळेच दीक्षित सोलंकी यांचे पार्थिव परत आणण्याच्या प्रक्रियेत तांत्रिक व राजनैतिक अडचणी येत असल्याची माहिती आहे. तूर्त आपल्या लाडक्या मुलाचे अंत्यदर्शन करण्यासाठी सोलंकी कुटुंब सरकारच्या निर्णयाकडे डोळे लावून बसले आहेत. या प्रकरणाची सुनावणी पुढील काही दिवसांत होण्याची शक्यता आहे.
