बहुमत नसल्यानेच राष्ट्रवादी-शिवसेनेचा रडीचा डाव:साताऱ्यात शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा पलटवार
![]()
सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांनी भाजपवर फोडाफोडीचे राजकारण आणि पोलिसांच्या मदतीने अडवणूक केल्याचा गंभीर आरोप केला आहे. मात्र, हे सर्व आरोप फेटाळून लावत बहुमत नसल्यानेच विरोधकांनी मतदानावर बहिष्कार टाकून पळ काढला आहे, राष्ट्रवादी व शिवसेनेच्याच सदस्यांचा आम्हाला सत्तेपासून रोखण्याचा प्रयत्न होता, अशी टीका सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली. जिल्हा परिषद सभापती निवडीच्या प्रक्रियेत सत्ताधारी भाजपने पोलिसांचा वापर करून सदस्यांना रोखले, असा आरोप करत राष्ट्रवादी व शिवसेनेच्या सदस्यांनी हाताला काळ्या फिती बांधून निषेध नोंदवला. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावरच धरणे आंदोलन करण्यात आले. सीसीटीव्ही कॅमेरे बंद ठेवणे आणि अर्ज भरण्यासाठी पुरेसा वेळ न देणे, असे मुद्दे विरोधकांनी उपस्थित केले आहेत. राष्ट्रवादी-शिवसेनेकडून रडीचा डाव या सर्व घडामोडींवर भाजपचे निवडणूक प्रमुख म्हणून आपली बाजू मांडताना शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, अर्ज भरण्यासाठी 10 ते 12 असे दोन तास देण्यात आले होते. केवळ 15 मिनिटे वेळ दिला, हा आरोप चुकीचा आहे. सर्व प्रक्रिया प्रसारमाध्यमांसमोर पार पडली आहे. मुळात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना आपल्याकडे बहुमत नाही, याची पूर्ण कल्पना होती. स्वतःची नामुष्की टाळण्यासाठी त्यांनी बहिष्काराचा ‘रडीचा डाव’ खेळला आहे. सीसीटीव्ही बंद असल्याच्या आरोपावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, निवडीनंतर आम्ही सभागृहात गेलो होतो, त्यामुळे कॅमेरे बंद करण्याचा आमचा प्रश्नच येत नाही. अध्यक्षांनी हवी तर चौकशी समिती नेमावी, आम्ही कोणत्याही चौकशीला तयार आहोत, असे आव्हानही त्यांनी दिले. सदस्य फोडले असे म्हणणे गैर- गोरे यावेळी उपस्थित असलेले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनीही विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. निवडणूक प्रक्रियेचे संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग उपलब्ध आहे. सीसीटीव्ही चालू असते तरी निकालात काहीही बदल झाला नसता, असे त्यांनी स्पष्ट केले. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना गोरे म्हणाले, पुढची पाच वर्षे राज्यकारभार कसा करायचा, हे आम्हाला चांगलेच ठाऊक आहे. ज्यांना स्वतःचे सदस्य सांभाळता येत नाहीत, त्यांनी आमच्यावर फोडाफोडीचे आरोप करणे हास्यास्पद आहे. जे लोक स्वतःच्या इच्छेने आमच्याकडे आले आहेत, त्यांना ‘फोडले’ म्हणणे चुकीचे आहे. यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. साताऱ्यातील या राजकीय संघर्षाने जिल्हा परिषदेच्या आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट केली आहे.
