पोलीस म्हणतात “आमच्या ताब्यात आहेत”, आणि व्हिडिओ म्हणतो आमचं नाटक सुरू आहे. दरम्यान, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असे बाबा ओरडतोय नाटक नको, नाटक नको! असे पोलीस त्याला सांगत आहेत. पण प्रेक्षकांना मात्र हे नाटक संपायची अजिबात घाई नाही.
या सगळ्या गोंधळात देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात एकदम स्पष्ट सांगितलं फोटोसोबत दिसलात म्हणून गुन्हा होत नाही. म्हणजे आता सेल्फी घेणाऱ्यांनी थोडा दिलासा घ्यावा; पण जर पुरावे मिळाले, तर बाबा असो की बाप कोणीही सुटणार नाही, असा इशाराही दिला.
दरम्यान, बाबांच्या मला मारलं या कथेला लोकांनी फारसं मनावर घेतलं नाही. कारण महाराष्ट्रात एक जुनी म्हण आहे पोलीस खाते करील ते होईल. ही म्हण इतकी जुनी आहे की ती आता जवळपास संविधानाच्या परिशिष्टात टाकायची वेळ आली आहे!

आता तर कथेत नवं ट्विस्ट पोलीस म्हणतात की बाबांच्या खात्यात कोट्यवधींची संपत्ती, पाच नरबळींच्या चर्चा, आणि एका जमीन व्यावसायिकाच्या मृत्यूची नव्याने चौकशी. म्हणजे आधी अध्यात्म, मग अर्थकारण, आणि आता क्राईम थ्रिलर सगळे जॉनर एकाच कथेत! प्रश्न मात्र साधाच आहे जे नेते पाच वर्षांनी येणाऱ्या योजना आधीच ओळखतात, त्यांना हा बाबा इतके दिवस कसा दिसला नाही? की चमत्कार फक्त निवडणुकीपुरतेच दिसतात?
यात एक गोष्ट मात्र खरी सोशल मीडियाने या प्रकरणात देवदूत काम केलं. त्या युवकाने व्हिडिओ व्हायरल केला नसता, तर कदाचित समाज अजूनही बाबांच्या आशिर्वादात शांत बसला असता. शेवटी, सभागृहात चर्चा, आरोप-प्रत्यारोप, अधिकारी वाचवले जात आहेत की नाही यावर वाद सगळं नेहमीसारखंच. कारण शेवटी एक सार्वत्रिक सत्य आहे सरकारच्या मनात आलं तरच घडतं… नाहीतर नाटक चालूच राहतं!
आता फक्त एकच प्रश्न उरतो
या सगळ्या कथेत मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? की घंटाही आधीच कोणाच्या ताब्यात आहे?
