उस्माननगर (प्रतिनिधी)- उस्माननगर पोलिसांनी महसूल विभागाच्या सहकार्याने चिंचोली आणि देवापूर शिवारात सुरू असलेल्या अवैध वाळू उपसावर मोठी कारवाई करत तब्बल ₹2 कोटी 10 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
17 मार्च रोजी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सय्यद मगदूम मेहबूब यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सहायक पोलीस निरीक्षक संजय नीलपत्रेवार,पोलीस उप निरीक्षक गाडेकर,पोलीस अंमलदार चिंचोरे,प्रकाश पेदेवाड,तुकाराम जुने आणि काही गृहरक्षक दलाचे जावान असे गोदावरी नदी पात्रातील चिंचोली (ता. लोहा) परिसरात भास्कर शिंदे यांच्या शेताजवळ अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाली म्हणून तेथे गेले. या कारवाईत महसूल विभागाचे ग्राम महसूल अधिकारी मोतीराम पवार व लक्ष्मण गोधनें यांना सोबत घेऊन देवापूर शिवारात तपासणी करण्यात आली. यावेळी आरोपींकडून मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन सुरू असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी घटनास्थळावरून
- 7 लोखंडी फायबर बोटी (₹1 कोटी 40 लाख)
- 7 लहान लोखंडी इंजिन बोटी (₹70 लाख)
- 10 ब्रास वाळू साठा (₹50 हजार)
असा एकूण ₹2.10 कोटींचा मुद्देमाल जप्त केला.
जप्त केलेल्या बोटींचा पंचनामा करून त्या जिलेटिनच्या सहाय्याने नष्ट करण्यात आल्या, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी उमेश गोविंदराव कांजाळकर, गजानन साहेबराव खानसोळे, नागेश रामराव लष्करे, नारायण दत्ता कल्याणे, बापूराव खोबराजी कल्याणे (सर्व रा. वासरी, ता. मुखेड), अवधूत बालाजी विठेवाड (रा. शंखतीर्थ, ता. मुदखेड) आणि कृष्णा हनुमंत इंगळे (रा. कामठा) यांच्यासह एकूण सात जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता व गौण खनिज कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नदी पात्रातील अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी पुढील काळातही अशाच धडक कारवाया सुरू राहणार आहेत.या कार्यवाही साठी पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी उस्मानगर पोलिसांचे कौतुक केले आहे.

