गिरीष महाजनांना सुनावणाऱ्या महिलेची प्रतिक्रिया समोर:25 मिनिटे ट्रॅफिकमध्ये, मुलीची काळजी ठरली कारण; टीना चौधरींनी सांगितले त्या दिवशी काय घडले?

0
db-temp-cover-marathi-2026-05-02t225228833_1777742623.jpg




दक्षिण मुंबईत भाजपच्या महिला मोर्चादरम्यान ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर आक्रमक पवित्रा घेणाऱ्या महिलेची ओळख अखेर पटली आहे. टीना चौधरी असे या महिलेचे नाव आहे २१ एप्रिल रोजी वरळीत झालेल्या या मोर्चात त्यांनी भाजप पदाधिकारी, पोलिस आणि थेट मंत्री गिरीश महाजन यांनाही धारेवर धरले होते. सोशल मीडियावर विविध तर्कवितर्क लढवले जात असतानाच, टीना चौधरी यांनी एका व्हिडिओद्वारे आपली बाजू मांडल आहे. काही दिवसांपूर्वी महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपने मुंबईत जोरदार निदर्शने केली होती. या मोर्चामुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती. यावेळी काळी टोपी घातलेल्या एका महिलेने गाडीतून उतरून आंदोलकांविरोधात जोरदार त्रागा केला होता. “लोकांना कामावर जायचे आहे, तुम्ही आम्हाला का वेठीस धरता?” असा सवाल करत त्यांनी मंत्र्यांनाही खडे बोल सुनावले होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओवर अनेक तर्कवितर्क लावले जात असतानाच, टीना चौधरी यांनी स्वतः आपली भूमिका स्पष्ट केली आहे. टीना चौधरी नेमके काय म्हणाल्या? टीना चौधरी यांनी या व्हिडिओमध्ये सांगितले की, “तुम्ही काही दिवसांपूर्वी (२१ एप्रिल) काळी टोपी घातलेल्या एका महिलेचा व्हिडीओ तुम्ही पाहिला असेल. महिला मोर्चात ती वाहतूक कोंडीबाबत प्रश्न विचारत होती. ती महिला मीच आहे. माझे नाव टीना चौधरी असून काही गोष्टींचे स्पष्टीकरण देण्यासाठी मी हा व्हिडीओ करत आहे” टीना चौधरी म्हणाल्या, “त्या घटनेनंतर माझ्याविषयी काळजी व्यक्त करणारे अनेक मेसेजेस मला आले. मी सर्वांना सांगू इच्छिते की, मी ठीक आहे. तुम्ही जी काळजी व्यक्त केली, त्याबद्दल सर्वांची आभारी आहे. त्यादिवशी (२१ एप्रिल) मी माझ्या मुलीला ४ वाजता म्युझिक क्लाससाठी सोडले. तिला परत आणण्यासाठी मी ४:४५ घरातून निघाले. पण मोर्चामुळे मी वाहतूक कोंडीत अडकले. जवळपास २५ मिनिटे मी गाडीतच होते. गाडी हलत नसल्यामुळे मी बाहेर येऊन काय चालले आहे, हे पाहण्यासाठी गेले. तेव्हा कळले की, आमच्या पुढे उभ्या असलेल्या बस पार्किंग केल्या होत्या. त्या तिथून हलतच नव्हत्या.” बाटली फेकण्यामागचे सांगितले कारण टीना चौधरी पुढे म्हणाल्या, “पुढचा अर्धा तास मी प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्याला जाऊन त्या बस काढण्यासंदर्भात विनंती करत होते. पण कुणीही मला दाद देत नव्हते. कुणी माझे ऐकतही नव्हते. मी जी बाटली फेकली ती कुणा मोर्चेकरी किंवा पोलिसावर फेकली नाही. तर फक्त लक्ष वेधून घेण्यासाठी ती कृती केली. कारण मी रस्त्याच्या पलीकडे उभी होते आणि माझ्या कमरेपर्यंत दुभाजक होता.” लष्करी वारसा आणि वर्दीचा आदर टीना चौधरी म्हणाल्या, “माझे आजोबा आणि वडील भारतीय सैन्यदलात होते. त्यांनी देशासाठी दोन युद्ध लढली आहेत. माझ्या कुटुंबातील एकूण ८ जणांनी भारतीय सैन्यदलात सेवा दिली आहे. मी ‘सेवा’ या शब्दावर जोर देते. कारण तुम्ही जेव्हा गणवेश परिधान करता तेव्हा तुम्ही जनतेचे सेवक असता. गणवेश घातला म्हणजे तुम्हाला एखाद्याचा अवमान करण्याचा किंवा त्याकडे दुर्लक्ष करण्याचा अधिकार मिळत नाही.” …म्हणून मी गिरीश महाजनांना बोलले गिरीश महाजन यांच्याबद्दलचा उल्लेख करताना टीना चौधरी म्हणाल्या, “महाजन यांच्याजवळ मी पोहोचले. तेव्हा सव्वा सहा वाजले होते. माझ्या मुलीपर्यंत मी कसे पोहोचणार? हाच प्रश्न माझ्या डोक्यात होता. यावेळी त्या मोर्चात महाजन असे एकच व्यक्ती होते, ज्यांनी माझे म्हणणे ऐकून घेतले. त्यांनी पोलिसांना सूचना देऊन त्या बस बाजूला सारण्याचे निर्देश दिले. बस बाजूला झाल्यानंतर आम्ही आमची वाहने मागे घेऊन इतर मार्गाने प्रवास केला.” राजकारण करणाऱ्यांना सुनावले खडेबोल दरम्यान, यासर्व प्रकरणानंतर ज्या काही चर्चा आणि राजकारण केले गेले त्यावरुन टीना यांनी खडेबोल सुनावत त्यांचे मत व्यक्त केले आहे. त्या म्हणाल्या, “कोणीही माझ्या खांद्याचा वापर करुन राजकारण करु नये, अशा परिस्थिती निर्माण होतात त्यामागे कारण असतात राजकीय पक्ष आणि भूमिका घेणारे नेते. त्यामुळे माझ्या नावाचा वापर करु नका. याचबरोबर माझ्यासाठी अनेक संदेश येत आहेत. नागरी प्रश्नांच्या संदर्भात मी पीडित जनतेचा आवाज होऊन पुढे यावे, अशी काही लोकांची इच्छा आहे. पण मीच का तुमचा आवाज बनावे. तुम्हाला स्वतःचा आवाज नाहीये का? असा प्रश्न टीना चौधरी यांनी उपस्थित केला.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed