पाकिस्थानच्या एअर स्ट्राईकला अफगाणिस्तानने दिले जोरदार प्रतिउत्तर 


अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव आता उघड युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. काही दिवसांपूर्वी काबूलमधील अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट आणि कठोर शब्दांत इशारा दिला होता जर पाकिस्तानने काबूलवर हल्ला केला, तर आम्ही इस्लामाबादवर प्रत्युत्तर देऊ हा इशारा केवळ राजनैतिक भाषण नव्हता; तो प्रत्यक्ष युद्धाचा संकेत होता. आणि आता घडामोडी पाहिल्या तर तो इशारा प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे.

काल पाकिस्तानी हवाई दलाने अफगाणिस्तानातील काबूल परिसरातील पक्का, पक्कीचा आणि इतर ठिकाणांवर हवाई हल्ले केले. वृत्तवाहिन्यांच्या माहितीनुसार हे हल्ले फक्त तीन ठिकाणी मर्यादित नव्हते, तर एकूण सहा ठिकाणी पाकिस्तानने बॉम्बहल्ले केल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यांमध्ये किमान तेरा अफगाणी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये निरपराध महिला आणि लहान बालकांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. डझनभराहून अधिक लोक जखमी झाले असून अनेकांची प्रकृती गंभीर आहे.

या घटनेनंतर अफगाणिस्तानमध्ये संताप उसळला आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमारेषेवर मोठ्या प्रमाणावर चकमकी सुरू झाल्या आहेत. सीमावर्ती भागात तोफगोळ्यांची देवाणघेवाण सुरू असून परिस्थिती झपाट्याने चिघळत चालली आहे. अफगाणिस्ताननेही आता थेट प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. अफगाण लढवय्यांनी पाकिस्तानमधील काही लष्करी तळांवर ड्रोन हल्ले केल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे हे हल्ले अशा भागांवर करण्यात आले आहेत जिथे पाकिस्तानचा संवेदनशील अणु कार्यक्रम चालतो किंवा त्यासंबंधित चाचण्या घेतल्या जातात. याआधीही काही दिवसांपूर्वी पाकिस्तानातील नूर खान एअर बेसवर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पाकिस्तानला वाटत होते की तो सीमापार हल्ले करून दबाव निर्माण करू शकेल; परंतु परिस्थिती आता उलटत असल्याचे चित्र दिसत आहे.

अफगाणिस्तानचे गृहमंत्री आणि हक्कानी नेटवर्कचे प्रमुख सिराजुद्दीन हक्कानी यांनी दिलेले विधान तर पाकिस्तानसाठी अधिक धोकादायक ठरू शकते. त्यांनी अत्यंत धक्कादायक दावा करत सांगितले की पाकिस्तानला स्वतःलाही माहीत नाही की त्यांच्या प्रत्येक मोठ्या शहरात आमचे हजारो लढाके आहेत. त्यांच्या मते पाकिस्तानच्या विविध शहरांमध्ये त्यांच्या वैयक्तिक नियंत्रणाखाली दहा हजारांहून अधिक लढवय्ये तयार स्थितीत आहेत. हक्कानी यांनी स्पष्ट शब्दांत पाकिस्तानला इशारा दिला आहे  पाकिस्तानने रेड लाईन ओलांडली आहे. आता आम्ही कुठे आणि कसा प्रहार करू, हे पाकिस्तानला कळणारही नाही. त्यांच्या या वक्तव्यामुळे पाकिस्तानमधील सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. कारण जर हा दावा खरा असेल, तर पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षेला प्रचंड धोका निर्माण होऊ शकतो.

अफगाणिस्तानच्या नेतृत्वाने इतिहासाचा दाखला देत पाकिस्तानवर कठोर टीका केली आहे. त्यांच्या मते, शेकडो वर्षांपासून अफगाण लोकांनी बाहेरील आक्रमकांविरुद्ध लढा दिला आहे. त्यांनी असा आरोप केला आहे की पाकिस्तान सतत अफगाणिस्तानच्या अंतर्गत व्यवहारांमध्ये हस्तक्षेप करत आहे. त्यामुळे आता अफगाणिस्तानमधील विविध गट एकत्र येत आहेत आणि पाकिस्तानविरोधात ठाम भूमिका घेत आहेत. काही अफगाण नेत्यांनी तर अत्यंत भावनिक आणि लढाऊ विधान केले आहे. त्यांनी सांगितले की आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत, आमच्या शेवटच्या लहान मुलाच्या जीवापर्यंत आम्ही लढत राहू. अशा प्रकारच्या विधानांमुळे या संघर्षाचे स्वरूप अधिक गंभीर होत असल्याचे स्पष्ट दिसते.

दरम्यान, वरिष्ठ पत्रकार पंकज यांच्या मते पाकिस्तानमधील राजकीय आणि लष्करी परिस्थिती अत्यंत अस्थिर आहे. त्यांनी दावा केला आहे की जर परिस्थिती अशीच राहिली तर पाकिस्तानमध्ये मोठा राजकीय स्फोट होऊ शकतो. काही विश्लेषकांचे मत आहे की पाकिस्तानच्या सत्ताधाऱ्यांची खुर्ची सध्या फार काळ टिकणार नाही. काही तज्ञांचे मत असेही आहे की या संघर्षामागे मोठे आंतरराष्ट्रीय राजकारणही काम करत आहे. अमेरिकेला अफगाणिस्तानमध्ये पुन्हा आपला प्रभाव प्रस्थापित करायचा आहे. विशेषतः बगराम एअर बेससारख्या महत्त्वाच्या लष्करी तळांवर पुन्हा नियंत्रण मिळवण्याची त्यांची इच्छा असल्याचे काही विश्लेषक सांगतात. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानवर दबाव टाकला जात असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

भारताने या संपूर्ण घटनाक्रमावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. भारताने अफगाणिस्तानवरील हवाई हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. संयुक्त राष्ट्र संघामध्ये भारताने स्पष्ट भूमिका मांडत सांगितले की पवित्र रमजान महिन्यात निरपराध नागरिकांवर हल्ले करणे अत्यंत निंदनीय आहे. भारताने असेही म्हटले आहे की लष्करी कारवाया जर केल्या जात असतील तर त्या दहशतवादी ठिकाणांवर लक्ष्यित असायला हव्यात; परंतु नागरिकांवर हल्ले होणे अजिबात स्वीकारार्ह नाही. अफगाणिस्तानने पाकिस्तानवर आणखी एक आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार पाकिस्तान आपल्या मनमानी पद्धतीने हल्ले करत आहे आणि त्यामुळे सामान्य नागरिकांचा बळी जात आहे. या हल्ल्यांनंतर अफगाण लढवय्यांनी प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानच्या काही सैनिकी चौक्यांवर हल्ले केले. काही ठिकाणी पाकिस्तानच्या सैन्याला माघार घ्यावी लागल्याचेही वृत्त समोर आले आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर दक्षिण आशियातील सुरक्षा परिस्थिती अधिकच धोकादायक होत चालली आहे. दोन अस्थिर देशांमधील हा संघर्ष जर वाढत गेला, तर त्याचे परिणाम केवळ त्या दोन देशांपुरते मर्यादित राहणार नाहीत. संपूर्ण प्रदेशात अस्थिरता वाढू शकते. सध्या परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण आहे. दोन्ही बाजूंनी कठोर भाषा वापरली जात आहे आणि सैनिकी हालचालीही वाढत आहेत. जर ही परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली, तर एक मोठा संघर्ष उभा राहू शकतो. जगभरातील तज्ञ आणि राजनैतिक विश्लेषक आता या घटनांकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *