जगातील सर्वात रुंद बोगद्याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद:मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील 'मिसिंग लिंक' प्रकल्पामुळे नवयुगा इंजिनिअरिंगचा पराक्रम
![]()
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नवयुगा इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेडने भारताच्या पायाभूत सुविधा क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील बहुप्रतीक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पांतर्गत जगातील सर्वात रुंद भूमिगत बोगदा निर्माण करून कंपनीने दुसऱ्या ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’वर नाव कोरले आहे. या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवयुगा इंजिनिअरिंगच्या अभियांत्रिकी कौशल्याचे कौतुक केले. सह्याद्रीच्या कठीण डोंगररांगांमधून जाणारा हा १३.३ किमी लांबीचा ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प आधुनिक अभियांत्रिकीचा एक उत्कृष्ट नमुना आहे. या प्रकल्पामुळे लोणावळा-खंडाळा घाटातील अवघड वळणे आणि वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होणार असून, मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ तब्बल ३० मिनिटांनी कमी होईल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प साकारण्यात आला आहे. या ऐतिहासिक सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि नवयुगा इंजिनिअरिंगचे व्यवस्थापकीय संचालक चिंत श्रीधर उपस्थित होते. या यशाबद्दल बोलताना चिंत श्रीधर म्हणाले, “हा केवळ जागतिक विक्रम नसून भारत काय साध्य करू शकतो याचे हे जिवंत उदाहरण आहे. सह्याद्रीच्या कठीण बेसॉल्ट खडकांमध्ये जगातील सर्वात रुंद बोगदा उभारणे हे आमच्या टीमच्या चिकाटीचे आणि जागतिक दर्जाच्या अंमलबजावणीचे प्रतीक आहे. हा आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे.” या प्रकल्पातील १०.६७ किमी भाग हा ५-लेन दुहेरी बोगद्यांचा असून त्याची रुंदी २२.३३ मीटर आहे. १८० मीटर खोल दरीत अत्याधुनिक UHPFRC गर्डर्स वापरून व्हायाडक्ट बांधणे हे मोठे आव्हान होते. प्रकल्पासाठी ८५ लाख टन खडक उत्खनन, ७,६०० टन स्टील आणि ९ दशलक्ष मनुष्यतासांची मेहनत लागली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. या बोगद्यात एआय आधारित नियंत्रण प्रणाली, २४x७ स्कॅडा मॉनिटरिंग, हाय-प्रेशर अग्निशमन यंत्रणा, आणि दर ३०० मीटरवर आपत्कालीन मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच अत्याधुनिक वायुवीजन प्रणाली आणि सीसीटीव्ही नेटवर्कमुळे हा प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे. नवयुगा इंजिनिअरिंगने गेल्या चार दशकांपासून देशातील महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये योगदान दिले आहे. या नवीन जागतिक विक्रमाने केवळ कंपनीचीच नव्हे, तर भारतीय अभियांत्रिकीची मान जगभरात उंचावली आहे. हा प्रकल्प पुणे आणि मुंबई या दोन प्रमुख शहरांमधील आर्थिक आणि प्रादेशिक गतीला नवी दिशा देणारा ठरेल.
