७४२ सातबारा व ५१२ आठ-अ उताऱ्यांचे वाटप; ४५ जणांना संजय गांधी योजनेचा लाभ
नांदेड – शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर अभियान (टप्पा क्र. १) अंतर्गत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड तालुक्यातील पहिले शिबिर तुप्पा येथे उत्साहात पार पडले. विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्यामुळे या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या शिबिरामध्ये ग्रामविकास, आरोग्य, कृषी, भूमिअभिलेख (मोजणी) तसेच दुय्यम निबंधक विभागासह विविध शासकीय विभागांनी सहभाग घेतला. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देत लाभार्थ्यांकडून अर्ज स्वीकारले.
तहसील कार्यालय, नांदेड यांच्यावतीने शिबिरात महसुली सेवांचे मोठ्या प्रमाणावर वितरण करण्यात आले. यामध्ये ७४२ ऑनलाईन सातबारा उतारे व ५१२ आठ-अ उतारे नागरिकांना देण्यात आले. तसेच ४५ पात्र लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ प्रदान करण्यात आला. याशिवाय फेरफार संदर्भातील अर्जही स्वीकारण्यात आले.
शिबिरामध्ये उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, सातबारा, ८-अ उतारे, सातबारा दुरुस्ती, फेरफार नोंदी आदी महसुली सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच आरोग्य विभाग, भूमिअभिलेख विभाग व पंचायत विभागानेही नागरिकांना विविध सेवा पुरवल्या. या कार्यक्रमास आमदार आनंदराव बोंढारकर तसेच उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी मार्गदर्शन केले.
तहसीलदार संजय वारकड यांनी प्रास्ताविकातून अभियानाची रूपरेषा स्पष्ट केली. नायब तहसीलदार माचेवाड यांनी सूत्रसंचालन केले, तर स्वप्नील दिगलवार यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. पुरवठा निरीक्षक रवींद्र राठोड यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांचे निराकरण केले.
तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी व तलाठी यांनी उपस्थित राहून अभियानास सहकार्य केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी मंडळ अधिकारी संतोष अस्कूलवार तसेच तलाठी गौतम पांढरे, योगिता अण्णमवार आणि दिलीप पवार यांनी विशेष योगदान दिले. तसेच तलाठी तालुका संघटनेचे अध्यक्ष अंकुर सकवान, सचिन उपरे, मंडळ अधिकारी अनिरुद्ध जोंधळे, शिवानंद स्वामी, येलमट्टी व बडवणे यांनीही सहकार्य केले. शासनाच्या विविध सेवा व योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

Post Views: 5
