"हा प्रवास माझा नसून महाराष्ट्राच्या जनतेचा":उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शरद पवारांनी व्यक्त केल्या भावना, आठवणींना दिला उजाळा




राज्यसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘संस्कृती’ आणि ‘सौहार्द’ पुन्हा एकदा अधोरेखित होताना दिसत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शरद पवार यांनी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेना ठाकरे गट आणि कॉंग्रेसने पाठिंबा दिला. विशेष म्हणजे तब्येतीच्या कारणास्तव शरद पवारांनी आपल्या घरूनच अर्ज दाखल केला. यावेळी निवडणूक अधिकारी पवारांच्या निवासस्थानी उपस्थित होते. अर्ज दाखल केल्यानंतर शरद पवारांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. शरद पवार यांनी ट्विट करत म्हटले, 1967 पासून माझा लोकप्रतिनिधी म्हणून प्रवास सुरू झाला आणि आजपर्यंत तो अखंडपणे सुरू आहे. हा प्रदीर्घ प्रवास केवळ माझा नसून महाराष्ट्राच्या जनतेचा आहे, कारण त्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे आणि पाठिंब्यामुळेच हा संसदीय प्रवास कधीही खंड न पडता पुढे सुरू ठेवणे मला शक्य झाले. 1967 मध्ये प्रथम महाराष्ट्रात विधानसभेवर निवडून जाण्याची संधी मिळाली. सार्वजनिक जीवनात आणि राजकारणात सातत्याने काम करत असताना लोकांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाच्या बळावर राज्यात मंत्री, मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेता अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडण्याची संधी मिळाली. तसेच केंद्रात संरक्षणमंत्री आणि दहा वर्षे कृषीमंत्री म्हणून काम करण्याची जबाबदारीही मला मिळाली. या सर्व जबाबदाऱ्या पार पाडताना महाराष्ट्रासाठी तसेच देशासाठी सकारात्मक काम करता आले, यामागे जनतेचा विश्वास हेच माझ्यासाठी सर्वात मोठे बळ राहिले आहे, असे शरद पवार म्हणाले. तसेच पुढे शरद पवार लिहितात, महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा एकदा पुढील सहा वर्षे सेवा करण्याची संधी देऊन माझ्यावर मोठा विश्वास दाखवला आहे. या विश्वासाबद्दल मी महाराष्ट्राच्या जनतेचा तसेच माझ्या सर्व मित्रपक्षांचा मनापासून ऋणी आहे. महाराष्ट्राने मला दिलेले प्रेम, विश्वास आणि पाठबळ हेच माझ्या आयुष्याच्या ऊर्जेचे खरे स्रोत आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी काम करण्याची संधी आयुष्यभर मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो. पुढील काळातही जनतेच्या अपेक्षांना न्याय देत ही सेवा प्रामाणिकपणे करत राहण्याचा माझा प्रयत्न असेल. शरद पवार म्हणाले, सध्या डॉक्टरांनी मला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे, त्यामुळे प्रत्यक्ष भेटून संवाद साधणे शक्य नसल्याने या पत्रकाच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत माझ्या भावना पोहोचवत आहे. महाराष्ट्राच्या जनतेचे प्रेम, पाठिंबा आणि विश्वास हेच माझ्यासाठी कायम प्रेरणादायी राहतील, अशा भावना पवारांनी व्यक्त केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *