![]()
राज्यात मार्चच्या सुरुवातीलाच उष्णतेने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक शहरांमध्ये तापमानात झपाट्याने वाढ होत असून नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः पुणे शहरात गेल्या काही दिवसांत तापमानात मोठी उसळी दिसून आली आहे. काही दिवसांपूर्वी 32 अंशांवर असलेला पारा आता 36 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. मार्चच्या पहिल्याच आठवड्यात 36 अंशांचा टप्पा गाठणे हे यंदाच्या हंगामातील आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान मानले जात आहे. पुढील काही दिवसांत तापमान 40 अंशांच्या जवळ जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दुपारी बारा ते चार या वेळेत शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. वाढत्या तापमानामुळे डिहायड्रेशन आणि उष्माघाताचा धोका वाढतो. त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. लिंबूपाणी, ताक यांसारख्या पेयांचे सेवन करावे. बाहेर पडताना सुती व हलक्या रंगाचे कपडे परिधान करावेत. विशेषतः लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींची काळजी घेणे आवश्यक आहे. उन्हाच्या तडाख्यात जास्त वेळ राहिल्यास चक्कर येणे, डोके दुखणे किंवा अशक्तपणा जाणवू शकतो, त्यामुळे लक्षणे दिसताच वैद्यकीय सल्ला घ्यावा, असेही सांगण्यात आले आहे. दरम्यान, सोलापूर शहरातही तापमानाने उसळी घेतली आहे. फेब्रुवारी महिना संपताच उकाडा वाढू लागला असून 3 मार्च रोजी कमाल तापमान 38.0 अंश सेल्सिअस म्हणजेच 100.4 फॅरेनहाइट इतके नोंदवले गेले. मार्चच्या पहिल्या तीन दिवसांतच उन्हाने तीव्र रूप धारण केल्याने सोलापूरकर हैराण झाले आहेत. सकाळपासूनच कडक उन्हाची जाणीव होत असून दुपारच्या वेळी रस्ते ओस पडलेले दिसतात. हवेतील आर्द्रता 34 टक्क्यांपर्यंत खाली आल्याने कोरड्या उकाड्याचा त्रास अधिक वाढला आहे. किमान तापमानही 22.9 अंशांवर गेल्याने रात्रीचा गारवा कमी झाला आहे. तापमानातील या वाढीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अचानक वाढलेल्या उष्णतेमुळे शरीराची सवय होण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे सकाळी किंवा संध्याकाळीच बाहेरची कामे उरकावीत, असे सल्ले दिले जात आहेत. सुती कपडे वापरणे, डोक्यावर टोपी किंवा ओढणी ठेवणे, तसेच पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक आहे. पुढील काही दिवसांत तापमान आणखी वाढेल आणि उन्हाची तीव्रता कायम राहील, असे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. कोकण पट्ट्यातही उष्ण आणि दमट हवामानाचा प्रभाव जाणवत आहे. मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने अस्वस्थता अधिक जाणवत आहे. मुंबईचे कमाल तापमान 29 ते 32 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे, तर किमान तापमान 24 ते 26 अंशांच्या आसपास राहील. समुद्रकिनारी भागांत दमटपणा अधिक असल्याने उन्हाचा चटका तीव्र जाणवू शकतो. त्यामुळे किनारी भागातील नागरिकांनीही आवश्यक ती काळजी घ्यावी, असे सांगण्यात आले आहे. उन्हाळ्याची चाहूल मार्चच्या सुरुवातीलाच तीव्र एकूणच राज्यात उन्हाळ्याची चाहूल मार्चच्या सुरुवातीलाच तीव्र झाली आहे. पुणे, सोलापूर आणि कोकणातील भागात वाढते तापमान आणि आर्द्रता यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घेणे हेच या वाढत्या उष्णतेपासून बचावाचे प्रभावी साधन ठरणार आहे.
पुणेकरांना हीट अलर्ट, विशेष काळजी घ्या:सोलापूर घामाघूम, कोकणात उकाडा; मार्चच्या पहिल्याच आठवड्यात उन्हाचा तडाखा
