![]()
राज्यसभेच्या जागेसाठी आज मविआतील 3 पक्षांची बैठक होणार आहे. ती माहिती आम्ही दिल्लीला पाठवू. आज कोणत्याही परिस्थितीमध्ये मविआचा राज्यसभेचा उमेदवार निश्चित होईल. अद्याप कोणतेही नाव अंतिम झालेले नाही, आमचा राष्ट्रीय पक्ष आहे तर आम्हाला राज्यसभा आणि उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेची जागा घ्यावी, असा आमचा आग्रह होता, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, आमच्या तिन्ही पक्षांचे जे ठरेल ते अंतिम असेल. अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. सुप्रिया सुळे, जयंत पाटील काय म्हणत आहे, याबद्दल मला काही माहिती नाही. मी आमच्या पक्षाची भूमिका मांडत आहे, आम्हाला दिल्लीहून कोणत्याही सूचना अजून आलेल्या नाही, हे स्पष्ट करत त्यांनी शरद पवारांची उमेदवारी निश्चित झालेली असे अप्रत्यक्षपणे सांगितले आहे. आमच्या तिन्ही पक्षाचे अंतिम निर्णय झाल्यावर आम्ही उमेदवाराचे काय ते ठरवू. दुबईत अडकलेले लोकं घाबरलेत विजय वडेट्टीवार म्हणाले की, इराण-इस्रायल युद्ध परिस्थिती पाहता दुबईमध्ये फार काही धोका नाही. पण लोकं दुबईमध्ये अडकलेली आहेत, तिथे जो एअरबेस वर हल्ला झाला त्यामुळे लोकं घाबरले आहेत, अशा स्थितीत केंद्र-राज्य सरकारने त्या नागरिकांची सुरक्षितपणे आणले पाहिजे. दुबईमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय लोकं आहेत, त्यांना तातडीने भारतामध्ये सुरक्षित आणले पाहिजे हीच आमची मागणी आहे. परदेशात अडकलेल्या नागरिकांना आणावे विजय वडेट्टीवार म्हणाले की, इराण-इस्रायल युद्धामुळे दुबई असो की इतर कोणत्याही देशात अडकलेले नागरिक हे भारतीय आहेत, त्याला मुस्लीम किंवा हिंदू असे फाटे फोडण्याची गरज नाही. त्यांना सुरक्षित आणणे हे सरकारचे काम आहे, यामध्ये जात, धर्म, पंथांचा काही विषय येत नाही. सरकार ती भूमिका बजावेल असे आम्हाला वाटते आहे. खुनाचा गुन्हा दाखल करावा विजय वडेट्टीवार म्हणाले की, नागपूरच्या 10 किमीवर 14 स्फोटकांचे कारखाने आहेत. यामध्ये दरवर्षी काही ना काही घटना होतात आणि त्यामध्ये कामगारांचा मृत्यू होतो. पेसोतचा जो कंट्रोल किंवा हेड ऑफीस तो नागपुरात आहे. त्यांच्या जवळ 10 किमीवर हे सगळे स्फोट घडत आहे. मुख्यमंत्री नागपूरचे आहेत आणि यापूर्वी अनेक वेळा याचे ऑडिट करण्याचे पत्र केंद्रीय मंत्रालयापासून फडणवीसाांपर्यंत देण्यात आले. त्यावर सरकार काही गांभीर्याने लक्ष घालत नाही. हा विषय आम्ही अधिवेशनात घेणार आहोत आज मृताचा आकडा 20 वर गेला असला तरी 7 ते 8 जण 75 टक्के पेक्षा जास्त भाजले आहेत, यावर आम्ही स्थगन प्रस्तावातून उत्तर मागणार आहोत. सरकार गपचूप कसे? असा सवाल वडेट्टीवार यांनी करत पैसे देऊन काय लोकांचे जीव परत येणार आहे का? तिथे सेफ्टीच्या दृष्टीने सरकार काय करत आहे. या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा नाही तर खूनाचा गुन्हा दाखल केला पाहिजे.
मविआचा राज्यसभेचा उमेदवार आज ठरणार:दुबईतील भारतीयांना परत आणा अन् नागपूर स्फोटप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करा- विजय वडेट्टीवार
