Dhananjay Munde Slams Congress Over Sunetra Pawar Beed Visit Controversy


उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बीड दौऱ्यादरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेतील गोंधळावर आमदार धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ‘काँग्रेसच्या मनात सुनेत्रा वहिनींबद्दल किती द्वेष आहे, हे त्यांच्या अधिकृत पेजवरून केलेल्या टीकेवरून दिसून येते,’

.

‘हा प्रश्नोत्तराचा कार्यक्रम नव्हता’

सुनेत्रा पवार यांच्या बीड दौऱ्याबाबत माहिती देताना धनंजय मुंडे म्हणाले, “24 तारखेला संध्याकाळी पाच वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजेपर्यंत सुनेत्रा वहिनींच्या विविध बैठका झाल्या. त्यानंतर माध्यमांना स्पष्ट कल्पना देण्यात आली होती की, ही पत्रकार परिषद नसून केवळ एक निवेदन असणार आहे. बैठकीतील कामकाजाची माहिती सुनेत्रा वहिनी स्वतः देतील. निवेदन करताना दादांच्या (अजित पवार) कामांबद्दल बोलताना वहिनी भावुक झाल्या होत्या. त्यांचा हुंदका आवरत नव्हता. असे असतानाही माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली.”

“अधिकृतपणे प्रश्नोत्तरे होणार नाहीत, असे सांगितलेले असतानाही प्रश्न विचारले जात होते. म्हणूनच मी पत्रकारांना थांबण्याची विनंती केली. सुनेत्रा वहिनी इतके मोठे दुःख पचवून जनतेची सेवा करण्यासाठी पुढे आल्या आहेत, अशावेळी आपणही थोडे भावनिक होऊन थांबायला हवे होते,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

धनंजय मुंडे हुकूमशहा कसा?

या घटनेवरून ‘धनंजय मुंडेंची हुकूमशाही’ असा आरोप करणाऱ्यांवर ते कडाडले. “मी फक्त थांबायला सांगितले, तर ती माझी चूक कशी ठरते आणि मला हुकूमशहा कसे ठरवले जाते? मी गेल्या अडीच वर्षांपासून माध्यमांसमोर बोलणे टाळतोय. सध्या माझ्याकडे कोणतेही मंत्रिपद नाही, मी फक्त एक आमदार आहे. तरीही माझ्याबद्दल इतका द्वेष का? एखाद्याला ठरवून टार्गेट करण्याची ही पद्धत आहे,” असा आरोप त्यांनी केला.

बीडमधील काही लोकांना जातीय राजकारणच करायचे आहे

बीड जिल्ह्याच्या राजकारणावर भाष्य करताना मुंडे म्हणाले, “बीडमधील 90 ते 95 टक्के पत्रकार अतिशय प्रामाणिकपणे काम करतात. पण काही ठराविक लोकांना बीडचे वातावरण शांत ठेवायचे नाही. त्यांना जातीपातीचे राजकारण सुरूच ठेवायचे आहे. गेल्या चार दिवसांत माझ्याबाबत जे घडले, ते याचेच उदाहरण आहे. माझ्या भाषणातील वाक्यांचे चुकीचे अर्थ काढले गेले. एका शेतकऱ्याला मी फक्त ‘शांतपणे बोला, वहिनीसाहेबांच्या लक्षात येईल’ असे सांगितले, तर माध्यमांनी चालवले की मी शेतकऱ्याला दम दिला. माझ्या पूर्ण भाषणाचा आशय न समजता केवळ काही वाक्ये कट करून पसरवली जात आहेत.”

काँग्रेसला टोला- ‘इंदिरा गांधींनाही गुंगी गुडिया म्हटले होते’

काँग्रेसने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरून सुनेत्रा पवार यांच्यावर ‘गुंगी गुडिया’ अशी टीका केल्याबद्दल धनंजय मुंडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. “सुनेत्रा वहिनींबद्दल काँग्रेसच्या मनात किती द्वेष आहे, हे यातून स्पष्ट होते. काँग्रेसने हे विसरू नये की, जेव्हा इंदिरा गांधी पहिल्यांदा पंतप्रधान झाल्या होत्या, तेव्हा विरोधक त्यांनाही ‘गुंगी गुडिया’ म्हणायचे. पण त्यांनी देशाची उत्तम सेवा करून दाखवली. सुनेत्रा वहिनीही आपले दुःख विसरून महाराष्ट्रातील जनतेची तशीच सक्षमपणे सेवा करून विरोधकांना चोख उत्तर देतील,” असा विश्वास मुंडेंनी व्यक्त केला.

तसेच, नीट (NEET) परीक्षेच्या गोंधळावर दिल्लीत आंदोलन करणाऱ्या काँग्रेसने, झारखंडमध्ये (जेथे त्यांचे सरकार आहे) झालेल्या पेपरफुटीवर गप्प का बसावे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांनी काँग्रेसवर आणि आपल्यावर टीका करणाऱ्यांवर सडकून टीका करत सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाचे जोरदार समर्थन केले.

हेही वाचा…

महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य कायदा लागू: का होतोय विरोध? धर्मांतरावर लगाम की धार्मिक स्वातंत्र्यावर गदा? काय आहेत नव्या कायद्याच्या तरतुदी! वाचा सविस्तर

महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळात अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर करण्यात आलेला आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अंतिम मंजुरीनंतर 30 जुलै 2026 रोजी राजपत्रात (गॅझेट) प्रकाशित झालेला ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा, 2026’ आता राज्यात अधिकृतपणे लागू झाला आहे. राजकीय वर्तुळात आणि सर्वसामान्यांमध्ये याला ‘धर्मांतर-विरोधी कायदा’ किंवा ‘लव्ह जिहाद कायदा’ असेही म्हटले जाते. हा कायदा केवळ एक कायदेशीर दस्तऐवज नसून, त्याचे राज्याच्या सामाजिक, धार्मिक आणि राजकीय पटलावर दूरगामी परिणाम होणार आहेत. हा कायदा नेमका काय आहे, त्याची अंमलबजावणी कशी होईल, कायद्यात पळवाटा किंवा त्रुटी काय आहेत आणि यावरून नेमका वाद का पेटला आहे, हेही जाणून घेणे महत्त्वाचे आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *