ग्रामपंचायत प्रशासक नियुक्ती लांबली:सरपंच संघटनांच्या याचिकेमुळे उच्च न्यायालयाने नेमणुका थांबवल्या; आता 24 फेब्रुवारीला सुनावणी




अमरावती जिल्ह्यातील ५५२ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा विषय पुन्हा लांबणीवर पडला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात या प्रकरणाची सुनावणी झाली, परंतु प्रशासनाने अधिक वेळ मागितल्याने पुढील सुनावणी आता २४ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने शासनाने पंचायत विभागाच्या विस्तार अधिकाऱ्यांना प्रशासक म्हणून नेमण्याचे आदेश दिले होते. मात्र, सरपंच संघटनांनी या आदेशाला न्यायालयात आव्हान दिले. त्यामुळे प्रशासकांच्या नेमणुका तात्पुरत्या टळल्या आहेत. यापूर्वी, गेल्या सोमवारी सर्व ग्रामपंचायतींवर विस्तार अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. परंतु, त्याच दिवशी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्या खंडपीठाने पुढील आदेश येईपर्यंत अशा नियुक्त्या रोखण्याचे आदेश दिले. यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाच्या सीईओ संजीता महापात्र यांनी जारी केलेले आदेश स्थगित झाले. मंगळवारी या प्रकरणाची सुनावणी झाली, परंतु कोणताही अंतिम निष्कर्ष निघाला नाही. प्रशासनाने अधिक वेळ मागितल्याने आता २४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रशासकीय राजवटीखाली येणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये धामणगाव रेल्वे तालुक्यातील सर्वाधिक ५५ ग्रामपंचायती आहेत. त्यापाठोपाठ नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ५१, दर्यापूर तालुक्यातील ४९, अमरावती तालुक्यातील ४६, अचलपूर तालुक्यातील ४३, चांदूर बाजार व वरुड तालुक्यातील प्रत्येकी ४१, मोर्शी तालुक्यातील ३९, भातकुली तालुक्यातील ३६, धारणीतील ३५, अंजनगाव सुर्जीतील ३४, चांदूर रेल्वे व मोर्शी तालुक्यातील प्रत्येकी २९ आणि चिखलदरा तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या सर्व ग्रामपंचायतींचा कार्यकाळ १० ते १८ फेब्रुवारीदरम्यान संपुष्टात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *