![]()
टिपू सुलतान हे इंग्रजांच्याविरोधात लढले हे सत्य जरी असले तरी त्यांनी काही अत्याचारही केले असे पुरावे इतिहासात आहे. मालेगावच्या उपमहापौर यांच्या दालनामध्ये टिपू सुलतानचा फोटो लागला यावरुन हा सर्व वाद सुरू झाला आहे. पण केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला करणे चूक आहे, असे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. अंबादास दानवे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत कुणाचीही तुलना केली जाऊ शकत नाही. शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्वबळावर निर्माण केले होते. त्यामध्ये माता-भगिणींची रक्षा केली होती. तर टिपू सुलतानने महिलेवर अत्याचार केल्याचे पुरावे आहे त्यामुळे बरोबरी होऊच शकत नाही. टिपू सुलतानच्या विचारांचं समर्थन होऊ शकत नाही पण भाजपची भूमिका दुटप्पी आहे. सपकाळांच्या वक्तव्याचे समर्थन होऊच शकत नाही, पण म्हणून काँग्रेस कार्यालयावर हल्ला करणे योग्य नाही. भाजपची भूमिका दुटप्पी अंबादास दानवे म्हणाले की, टिपू सुलतानच्या नावाने मार्गाला नाव द्यावे असा ठराव मुंबई मनपामध्ये भाजपच्या नगरसेवकांचा ठराव समोर आला आहे. माजी राष्ट्रपती असलेल्या कोविंद यांनी त्यांची शहादत झाली असे म्हटले होते. तर अब्दुल कलाम आझाद यांनीसुद्धा टिपू सुलतान विषयी असेच वक्तव्य केले होते. त्यांना भाजपने राष्ट्रपतीपदाचे उमेदवार केले होते. हा भाजपचा दुटप्पीपणा आहे. काँग्रेसला टार्गेट करणे आणि आपल्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी काय निर्णय घेतले याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे राज्यातील मुख्य प्रश्नांवरुन लक्षविचलित व्हावे यासाठी हा मुद्दा काढलेला दिसतो. भाजपने जिन्नाच्या कबरीला जाऊन पुष्पहार अर्पन केला अंबादास दानवे म्हणाले की, टिपू सुलतान कोणाला आवडतो किंवा नाही आवडत हे ज्याचा त्याचा विषय आहे. टिपू सुलतान इंग्रजांविरोधात लढले हे सत्य असले तरी त्यांनी हिंदूवर अत्याचार केले हे देखील तितकेच खरे आहे. टिपू सुलतानच्या विचारावर प्रेम असणारी औलाद अजूनही आपल्या देशात जिवंत आहे. हे जरी खरी असले तरी फोटो हा विषय व्यक्तिगत आहे. कोणी टिपू सुलतानचा फोटो लावावा की जिन्नाचा लावावा. भाजपने जिन्नाच्या कबरीला जाऊन पुष्पहार अर्पन केलेला आहेच, त्यामुळे तो व्यक्तिगत विषय आहे. हिंदू धर्म व्यापक, कुणीही मंदिरात जाऊ शकते आमदार अब्दुल सत्तार यांनी मंदिरात जात दर्शन घेतल्याच्या मुद्द्यावरुन भाजपने टीका केली होती यावर बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, मंदिर असो की मशीद असो ते सार्वजनिक ठिकाणं आहेत. भाजपचे कोण तुषार आहे तो काय शंकराचार्य लागून गेला का? एखादा मुस्लीम माणूस जर मंदिरात येत जर देवाचे दर्शन घेत असेल तर त्यांचे स्वागत केले पाहिजे. त्याला विरोध करण्याची गरज नाही. हिंदू धर्म हा खूप व्यापक आहे त्यांना संकुचित करण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. अवघे विश्वची माझे घर म्हणणारा हिंदू धर्म आहे.
टिपू सुलतानचे समर्थन नाही, पण भाजपची कृतीही चुकीची:शिवरायांनी स्वराज्य घडवले, टिपूचे अत्याचार इतिहासात नोंदवलेले- अंबादास दानवे
