पिंगळाई नदीत बुडून शेतमजुराचा मृत्यू:शेतातील काम संपवून घरी परतताना तोल गेला, तिवसा येथील घटना




तिवसा येथील पिंगळाई नदीत बुडून एका ४३ वर्षीय शेतमजुराचा मृत्यू झाला आहे. सतीश रंगरावजी गायकवाड (रा. सुरवाडी खुर्द, ता. तिवसा) असे मृत मजुराचे नाव आहे. ही घटना सोमवारी रात्री उशिरा घडली असून, मंगळवारी सकाळी उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, सतीश गायकवाड हे तिवसा भाग २ मधील एका शेतात मजुरीने फवारणीसाठी गेले होते. काम संपवून परत येत असताना पिंगळाई नदीजवळ त्यांचा तोल गेला आणि ते पाण्यात पडले. यात बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती सुरवाडी येथील पोलिस पाटील बंडू जाधव यांनी तिवसा पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. रात्रीच्या अंधारात पाण्यातून मृतदेह बाहेर काढून पंचनामा करण्यात आला. सतीश गायकवाड हे शेतमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात वृद्ध आई, वडील, पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *