समजाला विचार करायला बाध्य करणारी दुःखद घटना नाही तर ….
नांदेड (प्रतिनिधी)- गोवर्धन घाट परिसरात घडलेल्या अल्पवयीन मुलाच्या खून प्रकरणाने संपूर्ण शहर हादरले असून समाजमनाला अंतर्मुख करणारा हा धक्कादायक प्रकार ठरला आहे. क्षुल्लक वादातून उफाळलेल्या रागाने एका निरागस जीवाचा बळी घेतला असून, ही घटना केवळ गुन्हा नसून समाजासाठी गंभीर इशारा आहे.
महाशिवरात्रीच्या पवित्र वातावरणात काल दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास गोवर्धन घाट परिसरात राहणारे तीन अल्पवयीन मित्रांमध्ये जुन्या वादातून संघर्ष उफाळला. काही दिवसांपूर्वी झालेल्या भांडणात प्रिन्सने दोघांपैकी एका मुलाला मारहाण केली होती. त्या मारहाणीमध्ये संबंधित मुलाला आठ टाके घालावे लागले होते. या घटनेचा राग मनात धरून सूडाच्या भावनेतून दोघा अल्पवयीन मुलांनी प्रिन्सवर हल्ला केला. भर दुपारी झालेल्या या हल्ल्यात कमलप्रीतसिंघ खालसा उर्फ प्रिन्स गंभीर जखमी झाला. रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या प्रिन्सला परिसरातील नागरिकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात भीती आणि हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उप अधीक्षक रामेश्वर व्यंजने, पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला. मारेकऱ्यांची ओळख पटताच स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारानी यांनी तातडीने हालचाल करत आपल्या माहितगारांच्या मदतीने आरोपींचा पाठलाग सुरू केला. दोघेही अल्पवयीन आरोपी रिक्षाने नायगावकडे पळून गेले होते; मात्र पोलिसांच्या चपळ कारवाईमुळे त्यांना ताब्यात घेण्यात यश आले.स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी आपल्या पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.
या घटनेतील सर्वात वेदनादायक बाब म्हणजे हे तिघेही एकाच परिसरातील आणि एकेकाळी मित्र असलेले मुले होते. क्षणिक राग, सूडाची भावना आणि संवादाचा अभाव यामुळे एका मित्राचा जीव गेला. अल्पवयीन मुलांमध्ये वाढत चाललेली हिंसक प्रवृत्ती ही समाजासाठी धोक्याची घंटा आहे. पालक, शिक्षक आणि समाजघटकांनी यावर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. मुलांमध्ये संवाद, संयम, कायद्याची जाणीव आणि भावनिक समुपदेशनाची गरज आज अधिक प्रकर्षाने जाणवत आहे. लहान वयातच रागाचे रूपांतर हिंसेत होत असेल, तर भविष्यात त्याचे परिणाम अधिक भयावह असू शकतात. ही घटना केवळ एका कुटुंबाचा नाही तर संपूर्ण समाजाचा पराभव आहे. आजच जागरूक होऊन मुलांना योग्य दिशा दिली नाही, तर उद्याच्या प्रश्नांना उत्तर देणे अधिक कठीण होईल. समाजाने सामूहिक जबाबदारी स्वीकारून अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी ठोस पावले उचलणे अत्यावश्यक आहे.
