![]()
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह अतुल लिमये यांनी विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी अनुकरणीय मॉडेल समाज व्यवस्था उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. ३१ व्या पूजनीय श्रीगुरुजी पुरस्कार प्रदान समारंभात ते बोलत होते. यासाठी प्रमाणित कार्यपद्धती आणि योग्य प्रशिक्षण आवश्यक असून, केवळ शासनावर अवलंबून न राहता समाजाने स्वयंस्फूर्तीने सक्षम व्यवस्था उभी करावी, असे आवाहन त्यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती (महाराष्ट्र प्रांत) आयोजित हा ३१ वा पूजनीय श्रीगुरुजी पुरस्कार प्रदान समारंभ पुणे येथील विमाननगरमधील सिम्बायोसिसच्या एसव्हीसी सभागृहात पार पडला. यावेळी पद्मश्री दादा लाड आणि आचार्य महंत भारतभूषणदास महाराज यांना ज्येष्ठ उद्योजक डॉ. अभय फिरोदिया आणि सहसरकार्यवाह अतुल लिमये यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते. कार्यक्रमास पुणे महानगर संघचालक रविंद्र वंजारवाडकर आणि जनकल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. अजित मराठे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आपल्या भाषणात अतुल लिमये यांनी संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त संघकार्याचा व्यापक विस्तार झाल्याचे सांगितले. समरसता आचरणात आणणे कठीण असले तरी अस्पृश्यता निर्मूलन आणि समान सुविधांसाठी समाजाने पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. सार्वजनिक स्मशानभूमी आणि पाणीपुरवठा व्यवस्था सर्वांसाठी समान असावी, असेही ते म्हणाले. ज्येष्ठ उद्योजक डॉ. अभय फिरोदिया यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिस्तीवर आधारित कार्यपद्धतीचे कौतुक केले. हिंदुत्व ही केवळ वैदिक परंपरा नसून बौद्ध, जैन, शीख आदी सनातन परंपरांना एकत्रित करणारी जीवनदृष्टी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. युवा पिढीने मूल्याधिष्ठित जीवन जगल्यास धर्म सुरक्षित राहील, असे मत व्यक्त करत त्यांनी जनकल्याण समितीसाठी एक कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. पुरस्कार स्वीकारताना पद्मश्री दादा लाड यांनी कापूस संशोधनातील आपले अनुभव सांगितले. कमी उंचीच्या झाडांद्वारे अधिक उत्पादन घेण्यावर भर दिल्यास कापूस उत्पादन वाढू शकते, असे ते म्हणाले. शेतकरी आत्महत्यांऐवजी शेतकरी सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. आचार्य महंत भारतभूषणदास महाराज यांनी जीवनमूल्यांवर भाष्य करत आत्मिक सुखाच्या शोधावर भर दिला. संतपरंपरेतील सहजता, नम्रता आणि त्यागभावना समाजाने आत्मसात कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले. जनकल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. अजित मराठे यांनी समितीच्या पुढील उपक्रमांची माहिती दिली. थॅलेसिमिया रुग्णांसाठी मोफत रक्तपुरवठा, दिव्यांग पुनर्वसन आणि पाणी व्यवस्थापन या विषयांवर काम करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम्ने झाली.
विकसित भारतासाठी अनुकरणीय समाज व्यवस्था आवश्यक: अतुल लिमये:31 व्या श्रीगुरुजी पुरस्कार सोहळ्यात सहसरकार्यवाह लिमये यांचे प्रतिपादन
