भिवंडीतील हरिहर कंपाऊंडमध्ये भीषण आग:गादी आणि पेपर रोलची गोदामे भस्मसात, 10 ते 12 गोदामे आगीत जळून खाक




भिवंडी तालुक्यातील मानकोली येथील हरिहर कंपाऊंड परिसरात गादी आणि पेपर रोलच्या गोदामांना भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीने अल्पावधीतच रौद्र रूप धारण केल्यामुळे परिसरातील सुमारे 10 ते 12 गोदामे जळून खाक झाली आहेत. आगीची तीव्रता इतकी मोठी होती की, इमारतीचा पहिला आणि दुसरा मजला पूर्णपणे आगीच्या भक्षस्थानी पडला असून यामध्ये कोट्यवधी रुपयांच्या मालाचे नुकसान झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन जवानांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. गोदामांमध्ये ज्वलनशील पदार्थ असल्याने आग विझवताना अडचणी येत असल्या तरी, परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वीज वितरण कंपनी ‘टोरंट पावर’ला याबाबत वेळीच माहिती देऊनही त्यांचे कर्मचारी पोहोचण्यास विलंब झाल्याचा आरोप केला जात आहे. या विलंबादरम्यान आग वेगाने पसरली आणि तिने इमारतीच्या पहिल्या व दुसऱ्या मजल्यालाही आपल्या कचाट्यात घेतले, ज्यामुळे आगीची तीव्रता अधिकच वाढली. आगीची भीषणता लक्षात घेता भिवंडी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून जवानांकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने, या भीषण घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र गोदामातील साहित्यामुळे कोट्यवधी रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाचे जवान सध्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असून, ही आग पूर्णपणे कधी विझते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *