![]()
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताविषयी संशय व्यक्त केला आहे. अजित पवारांच्या अपघाताविषयी वेगवेगळे निष्कर्ष काढले जात आहेत. त्या विमानात बॉम्ब होता का? असेही म्हटले जात आहे. त्यामुळे या प्रकरणी अजित पवार घराबाहेर पडण्यापासून विमानात बसेपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज जाहीर केले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी एका विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. तेव्हापासून या घटनेविषयी वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यात आता बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांची भर पडली आहे. बजरंग सोनवणे या प्रकरणी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, अजित पवारांच्या अपघाताविषयी वेगवेगळे निष्कर्ष काढले जात आहेत. या घटनेचा सखोल तपास झाला पाहिजे. अजित पवार घराबाहेर पडल्यापासून विमानात बसेपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले पाहिजे. विमानात 6 लोक होते, मग 5 मृतदेहच का सापडले? ज्या प्रकारे अपघात झाला ते पाहता, त्या विमानात बॉम्ब होता का? हे पाहिले पाहिजे. अंजली दमानिया याच्या प्रश्नांची चौकशी झाली पाहिजे. विमानाचा पायलट कोण होता? याचीही चौकशी झाली पाहिजे. घटनेच्या दिवशीचे सकाळपासूनचे सीसीटीव्ही फुटेज दाखवले गेले पाहिजे. विमान वरच क्रॅश झाले. विमान वर हवेतच ब्लास्ट का झाले? असे वेगवेगळे प्रश्न सोनवणे यांनी या प्रकरणी उपस्थित केले. अजित पवार माजे राजकीय वडील बजरंग सोनवणे यांनी यावेळी आपल्या घडवण्यात अजित पवारांचा खूप मोठा वाट असल्याचेही स्पष्ट केले. ते म्हणाले, माझ्या जडणघडणीत अजित पवारांचा खूप मोठा वाटा आहे. मी 1999 मध्ये त्यांच्या संपर्कात आलो. ते माझे राजकीय वडील होते. आज संपूर्ण महाराष्ट्र दुःखात आहे. संपूर्ण देश दुःखात आहे. हा सर्व नियतीचा खेळ आहे. येडेश्वरी कारखाना परिसरात अजित पवार यांचे भव्य स्मारक उभारले जाईल. या स्मारकातून सर्वांना ऊर्जा मिळेल. हे स्मारक पुढील वर्षभरात बांधून तयार होऊन अजित पवारांच्या पहिल्या पुण्यतिथीला त्याचे लोकार्पण होईल. बीड जिल्ह्याच्या विकासाची वेळ आली आणि दादा गेले हे दुर्दैव आहे. दादा विमानात काय बोलले हे सांगणार नाही बजरंग सोनवणे यांनी यावेळी बीड जिल्ह्याचा यापुढे विकास होईल किंवा नाही यावरही संशय व्यक्त केला. ते म्हणाले, राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याच्या मुद्यावर मी भाष्य करणार नाही. कारण, आज ती वेळ नाही. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या बैठकीला मी नव्हतो. बीडहून संभाजीनगर व तेथून आम्ही सोबत विमानाने पुण्याला गेलो होतो. दादा मला प्रवासात काय बोलले हे मी आज सांगणार नाही. पण दादा जे काही मला बोलले होते, ते अपूर्ण राहू असे काम आम्ही करणार आहोत. आज राजकारणावर बोलण्याची वेळ नाही. 10 दिवसांचा दुखवटा असल्यामुळे मी माध्यमांशी बोललो नव्हतो. पण दादांचा आम्हाला खूप मोरल सपोर्ट होता. आता बीड जिल्ह्याचा विकास होईल की नाही? हे सांगता येत नाही. शरद पवार पक्षाचे प्रमुख होते, आहेत व यापुढेही राहतील, असेही सोनवणे यावेळी जोर देऊन म्हणाले. हे ही वाचा…
अजित पवारांच्या विमानात बॉम्ब होता का?:शरद पवारांच्या खासदाराचा सवाल; विमानात 6 जण होते, मग 5 बॉडी कशा सापडल्या? असा सवाल
