![]()
देशभरात प्रोस्टेट, मूत्रपिंड, मूत्राशय आणि अंडकोषाच्या कर्करोगासह युरोजेनिटल कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. ही बाब गंभीर आणि चिंताजनक असल्याचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे युरोलॉजिस्ट व युरोकूल हॉस्पिटलचे संस्थापक डॉ. संजय कुलकर्णी यांनी म्हटले आहे. मात्र, योग्य वेळी निदान झाल्यास आधुनिक वैद्यकीय उपचारांच्या मदतीने या कर्करोगावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवणे शक्य असल्याचेही त्यांनी नमूद केले. यासाठी व्यापक जनजागृती, नियमित आरोग्य तपासण्या आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे, असे मत डॉ. कुलकर्णी यांनी व्यक्त केले. जागतिक कर्करोग दिनानिमित्त बाणेर येथील युरोकूल हॉस्पिटलमध्ये आयोजित माध्यम संवादावेळी ते बोलत होते. यावेळी भारतातील पहिल्या महिला लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी, रोबोटिक सर्जन डॉ. अमित होसरमनी, युरोऑन्को सर्जन डॉ. रोहित देशपांडे व डॉ. उदय चंदनखेडे, बाणेर-बालेवाडी मेडिकोज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजेश देशपांडे आणि युरोकुलचे प्रशासकीय अधिकारी डॉ. प्रमोद भावे उपस्थित होते. डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले की, प्रोस्टेट कर्करोगात लघवी करताना अडथळा आणि वारंवार लघवी होणे, तर मूत्राशयाच्या कर्करोगात लघवीतून रक्त जाणे ही प्रमुख लक्षणे असतात. अनेकदा सुरुवातीला ही लक्षणे स्पष्ट दिसत नाहीत, त्यामुळे पन्नाशीनंतर नियमित तपासण्या करणे महत्त्वाचे आहे. जीवनशैलीतील बदल, धूम्रपान, तंबाखूचे सेवन, लठ्ठपणा आणि शारीरिक हालचालींचा अभाव ही कर्करोगाच्या वाढत्या प्रमाणामागील प्रमुख कारणे आहेत. त्यांनी नागरिकांना दुखणे अंगावर न काढता वेळेवर डॉक्टरांकडे जाण्याचे आवाहन केले, कारण उशीर झाल्यास उपचार गुंतागुंतीचे होऊ शकतात. डॉ. अमित होसरमनी यांनी रोबोटिक सर्जरीबद्दल माहिती दिली, तर डॉ. रोहित देशपांडे यांनी किडनी व अन्य कर्करोगांवर प्रकाश टाकला. डॉ. उदय चंदनखेडे यांनी कर्करोग जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपायांवर मार्गदर्शन केले. डॉ. चंदनखेडे यांनी २०४५ पर्यंत जगभरात कर्करोगग्रस्तांचे प्रमाण तीन कोटी २६ लाखांवर जाईल, तर कर्करोगाने मृत्यू होण्याचे प्रमाण जवळपास पावणेदोन कोटींपर्यंत असेल, असा धोकादायक अंदाजही वर्तवला. युरोलॉजी व किडनी संदर्भातील आजारांवरील उपचारांसाठी महाराष्ट्र राज्याची महात्मा फुले जनआरोग्य योजना युरोकूल हॉस्पिटलमध्ये लागू झाली आहे. गरजू व पात्र रुग्णांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. राजेश देशपांडे यांनी केले. डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी यांनी कर्करोगाविषयीचे गैरसमज दूर करून समाजात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याची गरज व्यक्त केली. कर्करोग म्हणजे शेवट नाही; योग्य उपचार, सकारात्मक मानसिकता आणि कुटुंबाचा आधार मिळाल्यास रुग्ण सामान्य आयुष्य जगू शकतो, असा आशावादी संदेश त्यांनी दिला.
युरोजेनिटल कर्करोगाचे प्रमाण वाढतेय:डॉ. कुलकर्णींनी चिंता व्यक्त केली; वेळेवर निदान व उपचाराने यावर मात शक्य
