पोलिस दलात कार्यरत राहून दोघे बनले पीएसआय:उत्कर्ष मोहरे लेफ्टनंटपदी पाचपीरवाडीतील ग्रामस्थांच्या वतीने तीन जणांचा सत्कार
![]()
प्रतिनिधी | लासूर स्टेशन मनाशी जिद्द असेल तर नशीब बदलायला वेळ लागत नाही. याचा प्रत्यय पाचपीरवाडीतील तीन तरुणांनी दाखवला आहे. पाचपीरवाडीतील शेतकरी पुत्र अनिल गिरजाराम नायमने आणि सुनील विठ्ठल जंघाळे या दोघांची पोलिस कर्मचारी ते पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. दोघेही पोलीस दलात कार्यरत असताना कर्तव्य सांभाळून त्यांनी एमपीएससी परिक्षेत यश मिळवले. तर गावातील उत्कर्ष गोरख मोहरे याची वयाच्या १७ व्या वर्षी भारतीय सैन्यात लेफ्टनंटपदी निवड झाली आहे. उत्कर्षने देशात २०५ वा क्रमांक फटकावला आहे. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. पाचपीरवाडीमधून तिघांची मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रमात अनिल नायमने, सुनिल जंघाळे आणि उत्कर्ष गोहरे यांनी स्पर्धा परिक्षेचा अभ्यास कसा करावा या विषयी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून वेरुळ येथील अन्नपूर्णा कैलास आश्रमाचे मठाधिपती अभायानंदगिरी महाराज, ह.भ.प. पंडित वाकडे, शेतकरी संघटनेचे नेते महेश गुजर, डोणगावचे संरपच संजय सुलाने, आदर्श शिक्षक गुजर सर, बापु सोमासे, धरमसिंग बिमरोट आदींसह गांवकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन संरपच, नेहरु जारवाल मित्र मंडळ व गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले होते. सूत्रसंचालन विलास काळे तर आभार प्रदर्शन वाल्मीक नायमने यांनी मानले. दहावीत कमी गुण, तरीही जिद्दीने गाठले लेफ्टनंट पद अनिल व सुनील या दोघांचे आई वडील शेती करतात. तर उत्कर्षचे वडील उद्योजक आहे. एखाद्या वेळेस अपयश आले तर खचून न जाता जिद्दीने मेहनत करून पुन्हा यश प्राप्त करता येते, असे उत्कर्ष मोहरेने सांगितले. मला दहावीत कमी मार्क मिळाल्याने मी निराश न होता प्रयत्न करून लेफ्टनंट पदापर्यंत पोहोचलो, असे त्याने सांगितले.
