![]()
पुणे: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) अभ्यासक्रमात नीतिशास्त्र विषय समाविष्ट करण्याच्या निर्णयावर त्यावेळी चौफेर टीका झाली होती, असे मत आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. डी. पी. अग्रवाल यांनी व्यक्त केले. तत्कालीन सरकार आणि मंत्रालयाने आयोगावर विश्वास दाखवल
.
ते एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी (MIT-ADT) विद्यापीठातील स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस (SICS) तर्फे आयोजित ‘नागरी सेवा आणि राष्ट्रनिर्मिती’ या राष्ट्रीय परिषदेत बोलत होते. ही परिषद नागरी सेवांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती.
याप्रसंगी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. किशोर राजे निंबाळकर, विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष तथा कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड, प्रोव्होस्ट डॉ. सायली गणकर, प्र-कुलपती डॉ. मोहित दुबे, स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसचे संचालक डॉ. सुजित धर्मपात्रे आणि स्कूल ऑफ लॉचे अधिष्ठाता डॉ. गोविंद राजपाल आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. अग्रवाल यांनी पुढे सांगितले की, नागरी सेवा परीक्षांमध्ये नीतिशास्त्राचा अंतर्भाव करण्यापूर्वी तो विषय ग्वाल्हेर येथील माहिती तंत्रज्ञान व व्यवस्थापन संस्था (IITM) येथे समाविष्ट करण्यात आला होता. कोणालाही त्रास न देता प्रभावीपणे काम करण्यासाठी नीतिशास्त्र महत्त्वाचे आहे. नीतिमूल्यांच्या पालनामुळे जगात शांतता प्रस्थापित होते. त्यामुळे देशाचा कणा असलेल्या भावी प्रशासकांमध्ये नीतिमूल्ये असणे अत्यंत आवश्यक आहे, असे त्यांनी ठामपणे नमूद केले.
ते म्हणाले की, सर्वच जण सनदी अधिकारी होऊ शकत नाहीत. UPSC आणि MPSC व्यतिरिक्तही समाजात विधायक बदल घडवून राष्ट्रनिर्मितीत हातभार लावता येतो. याच परिषदेत बोलताना प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी सांगितले की, भारताला विकसित करण्याची जबाबदारी केवळ सरकार किंवा अधिकाऱ्यांची नाही, तर प्रत्येक नागरिकाला नागरी जबाबदारीची जाणीव असणे आवश्यक आहे.
प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात पूर्ण क्षमतेने, प्रामाणिकपणे आणि नियमांचे पालन करून काम केल्यास २०४७ पर्यंत भारत विकसित होऊन जगात महासत्ता बनेल, असा विश्वास प्रा. डॉ. कराड यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने नागरी सेवा तसेच राज्य सेवा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘लक्ष्य’ या क्लबची स्थापना करण्यात आली. या क्लबच्या माध्यमातून विद्यापीठातील अभियांत्रिकी, व्यवस्थापन किंवा इतर कोणत्याही शाखेत शिक्षण घेणाऱ्या आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांना MIT-SICS मधील प्राध्यापक व तज्ज्ञांकडून सातत्यपूर्ण मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे.
