चिचखेडा ग्रामपंचायतीचे अभिनव ठराव:बालविवाह रोखणार, कन्या जन्माला प्रोत्साहन; मेळघाटातील हे गाव आदर्श ग्राम योजनेच्या दिशेने




मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील चिचखेडा हे छोटेसे गाव आपल्या लोकोपयोगी ठरावांमुळे चर्चेत आले आहे. ग्रामपंचायतीने बालविवाह रोखणे, प्लास्टिकचा वापर टाळणे आणि कन्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी टपाल खात्याच्या सुकन्या योजनेचा आर्थिक भार उचलणे यासह अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. गावकऱ्यांनी केवळ ठराव करून थांबले नाहीत, तर त्यांची अंमलबजावणीही तातडीने सुरू केली आहे. या प्रयत्नांची दखल घेत जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजीता महापात्र यांनी नुकतीच चिचखेडा गावाला भेट दिली. गावकऱ्यांनी घेतलेले निर्णय आणि त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी पाहून दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. त्यांच्या मते, शासनाच्या आदर्श गाव योजनेच्या अनुषंगाने चिचखेडा येथील रहिवाशांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचा ठाम निर्णय घेतला असून, त्या दिशेने ते कार्यरत आहेत. या संदर्भात बोलताना सरपंच हीराय चव्हाण, ग्रामसेवक जतन दहिकर आणि पोलीस पाटील बाबूभाई अजनेरिया यांनी गावकऱ्यांचे कौतुक केले. गावात कोणताही नवीन निर्णय घेताना सामूहिक सहभाग घेतला जातो. ग्रामपंचायतीचे आठ पदाधिकारी असले तरी, गावातील प्रत्येक कुटुंबाला विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला जात नाही. यामुळे संपूर्ण गाव एकोप्याने नांदत असून, आठवड्यातील ठराविक दिवशी ग्रामस्वच्छता, नियमित आरोग्य तपासणी आणि शाळेला भेटी यांसारख्या बाबी नित्यक्रमाने पूर्ण केल्या जातात. मेळघाटात बालविवाहाचे प्रमाण अधिक असल्याचे बोलले जाते, परंतु चिचखेडा गाव याला अपवाद ठरले आहे. या गावात आतापर्यंत एकही बालविवाह झालेला नाही. भविष्यातही असा प्रकार घडणार नाही, असा ठराव ग्रामपंचायतीने संमत केला आहे. मुलींचा जन्म अडचणीचा मानला जात असला तरी, येथे ‘बेटी है तो भविष्य है’ आणि ‘पहिली बेटी-तूप-रोटी’ अशा घोषणांसह कन्या जन्माला प्रोत्साहन दिले जाते. मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने टपाल खात्याच्या सुकन्या योजनेतील २५ टक्के आर्थिक भार उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *