काय बोलणार, बोलण्यास शब्दच नाहीत:अजितदादांच्या जण्याने आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला; आमदार राजेश नवघरे बारामतीकडे रवाना




बारामतीच्या घटनेबद्दल काय बोलणार, बोलण्यास शब्दच नाही, माझ्यावर निस्सीम प्रेम करणारा माझा पाठीराखा सोडून गेला अशा शब्दात राष्ट्रवादीचे वसमतचे आमदार राजेश नवघरे यांनी आश्रूंना वाट मोकळी करून दिली. त्यानंतर ते तातडीने बारामतीकडे रवाना झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे विमान लँडींगच्या दरम्यान अपघात झाल्याने त्यांचे निधन झाले. सदर धक्कादायक वृत्त कळताच वसमतचे आमदार राजेश नवघरे यांना रडूच कोसळले. आमदार म्हणून काम करतांना माझ्या प्रत्येक अडचणींना ते मदत करीत होते. माझ्या कामावर त्यांचा प्रचंड विश्‍वास होता या विश्‍वासाच्या बळावरच त्यांनी मला दुसऱ्यांदा वसमत विधानसभेची उमेदवारी दिली अन माझ्या प्रचारासाठी वसमत येथेही आले. वसमतकरांनो राजूच्या पाठीशी रहा अशी साद त्यांनी वसमतकरांना घातली होती. त्यामुळेच आपला विजय सुकर झाला होता. त्यानंतर वसमत विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी ज्या ज्या वेळी प्रस्ताव घेऊन गेलो त्यावेळी त्यांनी सर्व बाबी समजून घेत नागरीकांना, शेतकऱ्यांना फायदा होतो आहे का असा प्रश्‍न नेहमी विचारत अन त्यानंतरच त्या प्रस्तावाला मान्यता देत. जनतेची काम करण्यासाठी सदैव तत्पर रहा असा त्यांचा मला नेहमीच सल्ला होता. त्यांचा प्रत्येक सल्ला मी एेकत असल्याने मी त्यांच्या विश्‍वालासा पात्र ठरलो होतो. त्यांच्याकडे घेऊन गेलेल्या प्रत्येक कामाला त्यांनी सकारात्मकच प्रतिसाद देऊन कामांना मान्यता दिली. आजच्या या घटनेने मन सुन्न झाले असून काय बोलावे हे शब्दच सुचत नाहीत. माझा पाठीराखा आज नाही ही कल्पनाही करू शकत नाही. या घटनेमुळे आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असल्याचे सांगत त्यांनी आश्रूंना वाट मोकळी करून दिली. दरम्यान, आमदार नवघरे हे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह बारामतीकडे रवाना झाले आहेत. त्यांची कौतूकाची थाप शेवटची ठरली नुकत्याच झालेल्या नगर पालिका निवडणुकीत वसमत पालिकेवर एकहाती सत्ता आणली. या विजयानंतर त्यांच्याशी बोलणे झाले. त्यांनी पाठीवर कौतूकाची थाप दिली अन अशीच जनतेची कामे करून त्यांचा विश्‍वास कमव अन खुप मोठा हो असा आशीर्वाद दिला. त्यांची हि कौतूकाची थाप शेवटची ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *