कल्याणमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृत्यू:पोलिस प्रशासनावर गंभीर आरोप; रमेश तिखेंना आला होता हृदयविकाराचा झटका




कल्याण-डोंबिवलीतील शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी रमेश तिखे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने झालेला मृत्यू पोलिस चौकशीच्या तणावातून झाल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, माजी नगरसेवक मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे बेपत्ता असल्याची तक्रार ठाकरे गटानेच कोळशेवाडी पोलिस ठाण्यात दिली होती व तसे पोस्टर्सही शहरात लावले होते. मात्र मधुर म्हात्रे यांनी स्वतः समोर येत हे पोस्टर लावणाऱ्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याच प्रकरणात पोलिसांनी रमेश तिखे यांना चौकशीसाठी फोन करून बोलावल्याने त्यांना धक्का बसला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात असून, यावरून स्थानिक राजकारण चांगलेच तापले आहे. मधुर म्हात्रे यांच्या वडिलांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर, पोलिस तपासाच्या नावाखाली वारंवार फोन करून कार्यकर्त्यांना घाबरवण्याचा व मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करत होते, असा दावा केला जात आहे. या सततच्या पोलिस कारवाईच्या धास्तीमुळेच तिखे यांचा मृत्यू झाल्याचे सांगत, ठाकरे गटाने या प्रकरणाला उमेश म्हात्रे आणि पोलिस प्रशासनाला जबाबदार धरले असून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. नेमके प्रकरण काय? कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या वातावरणात शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे बेपत्ता असल्याची तक्रार खुद्द ठाकरे गटानेच कोळशेवाडी पोलिस ठाण्यात दिली होती. या तक्रारीनंतर हे दोन्ही नगरसेवक नक्की गेले कुठे, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे त्यांचा शोध घेण्यासाठी आणि या प्रकरणाकडे लक्ष वेधण्यासाठी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन शहरात विविध ठिकाणी हे नगरसेवक बेपत्ता असल्याचे पोस्टर्स लावले होते. या पोस्टरवर “नगरसेवक कुठे आढळल्यास ठाकरे गटाच्या शाखेला संपर्क साधावा,” असा मजकूरही प्रसिद्ध करण्यात आला होता. मात्र, या पोस्टरबाजीमुळे नगरसेवकांची नाहक बदनामी होत असल्याचा दावा त्यांचे नातेवाईक दिव्येश म्हात्रे यांनी केला. याप्रकरणी म्हात्रे यांनी कोळशेवाडी पोलिस ठाण्यात ठाकरे गटाच्या संबंधित पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला आणि पोस्टर लावण्यात सहभागी असलेल्या पदाधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी त्यांना चौकशीला बोलावण्याचे सत्र सुरू केले. पोलिसांकडून वारंवार येणारे फोन आणि चौकशीचा दबाव यामुळे कार्यकर्त्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याच प्रकरणाचा पाठपुरावा सुरू असताना, कल्याण पूर्वेतील करपेवाडी परिसरात राहणारे आणि या पोस्टर मोहिमेत सक्रिय असलेले ठाकरे गटाचे पदाधिकारी रमेश तिखे यांचा आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. पोलिसांकडून चौकशीसाठी वारंवार येणारे फोन आणि त्यातून निर्माण झालेला मानसिक ताण व दबाव यामुळेच तिखे यांची प्रकृती खालावली आणि त्यांचा जीव गेला, असा खळबळजनक आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या घटनेमुळे स्थानिक राजकारण चांगलेच तापले असून पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *