प्रजासत्ताक दिनी राहुरी रक्तबंबाळ!:एकाच दिवशी दोन भीषण अपघातात, तरुणाचा मृत्यू तर तीन जखमी; प्रशासकीय 'खुना'चा आरोप




देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह असतानाच राहुरी शहरातून जाणाऱ्या नगर-मनमाड महामार्गावर आज रक्ताचे सडे पडले. महामार्गाच्या कामातील संथ गती, रस्त्यावर पसरलेली खडी आणि अवजड वाहतुकीमुळे एकाच दिवशी दोन अपघात झाले. यात लोणी येथे बी.एस्सी. ॲग्रीचे शिक्षण घेणाऱ्या संकेत सखाराम बाचकर (वय १८, रा. गौटुंबा आखाडा) या हुशार तरुणाचा ट्रकच्या चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू झाला, तर अन्य तीन युवक गंभीर जखमी झाले आहेत. पहिला अपघात: गाडगे आश्रम शाळेसमोर काळाचा घाला गोटुंबा आखाडा येथील संकेत बाचकर आणि त्याचा मित्र श्रीकांत काशिनाथ हापसे (वय २१) हे दोघे राहुरी कॉलेज येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमाहून परतत होते. नगर-मनमाड महामार्गावरील गाडगे आश्रम शाळेसमोर रस्त्याचे काम सुरू असल्याने खडी टाकलेली आहे. ही खडी वाचवण्याच्या प्रयत्नात जड वाहने धोकादायक पद्धतीने चालवली जात आहेत. सकाळी पाठीमागून येणाऱ्या ट्रकने (क्रमांक TN 29 BZ 3381) संकेतच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत संकेत ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर श्रीकांत हापसे याच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. मयत संकेत हा शांत व प्रेमळ स्वभावाचा होता. त्याचे वडील स्कूल बसवर चालक म्हणून काम करतात. मुलाच्या निधनाने बाचकर कुटुंबावर डोंगर कोसळला आहे. दुसरा अपघात: बस स्थानकासमोर थरार पहिली घटना ताजी असतानाच काही मिनिटांत राहुरी बस स्थानकासमोर दुसरा अपघात घडला. रस्त्यावरील खडीवरून दुचाकी घसरल्याने कानडगाव येथील प्रसाद शरद गागरे (वय १८) आणि सार्थक कैलास आहेर (वय १९) या दोन तरुणांना आयशर टेम्पोने उडवले. या अपघातात प्रसाद गागरे याचा हाताचा पंजा पूर्णपणे ठेचला गेला असून पायालाही गंभीर दुखापत झाली आहे, तर सार्थक आहेर हा किरकोळ जखमी झाला आहे. ​प्रशासकीय ‘खुना’चा आरोप! या दोन्ही अपघातांना सर्वस्वी अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे (NHAI) प्रकल्प संचालक आणि संबंधित भारत कन्स्ट्रक्शन कंपनी जबाबदार असल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे. रस्ता दुरुस्त कृती समितीने वारंवार मागणी करूनही या महामार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली नाही. गेल्या तीन महिन्यांपासून कामाचा वेग संथ असून, सुरक्षेचे कोणतेही नियम न पाळता रस्त्यावर खडी टाकली जात असल्याने दुचाकीस्वार मृत्यूच्या दाढेत ढकलले जात आहेत. आंदोलनाचा पवित्रा प्रजासत्ताक दिनीच एका निष्पाप विद्यार्थ्याचा बळी गेल्याने आणि तिघे जखमी झाल्याने राहुरी परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने आता तरी जागे व्हावे, अन्यथा येणाऱ्या काळात मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशारा राहुरीतील नागरिकांनी आणि कृती समितीने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *