![]()
महापालिका निवडणुकांचे निकाल लागले असून आता महापौर पदाच्या निवडीवरून रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यातच विजयी नगरसेवकांची पळवापळवी देखील करण्याचे प्रकार सुरू झाल्याचे बोलले जात आहे. मुंबईसह उपनगरातील महापालिकांमध्ये नगरसेवकांना फोडण्याचा प्रयत्न होत असून शिवसेना ठाकरे गटाचे 4-5 नगरसेवक फुटल्याची चर्चा आहे. त्यात मुंबई वॉर्ड क्रमांक 157 मधील ठाकरे गटाच्या नगरसेविका सरिता म्हस्के नोट रिचेबल आहेत. यावर आता आमदार अनिल परब यांनी स्पष्टीकरण दिले आहे. सरिता म्हस्के या नोट रिचेबल असल्याने एकच खळबळ उडाली होती. आता यावर अनिल परब यांनी भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, नगरसेविका सरिता म्हस्के आमच्या संपर्कात आहेत, त्या कुठेही गेलेल्या नाहीत. त्यांनी त्यांचे कौटुंबिक कारण सांगितले आहे. पुढील एक महिन्यापर्यंत कोकण विभागीय आयुक्तांकडे नोंदणी करण्यासाठी कायदेशीर वेळ आहे. त्यामुळे सरिता म्हस्के यांची नोंदणी होईल. म्हस्के यांनी दिलेले कारण आम्ही कोकण विभागीय आयुक्तांना सांगितले आहे, अशी माहिती परब यांनी दिली. तसेच पुढील एक महिन्यात त्या न आल्यास काय कारवाई करायची याबाबत पक्षश्रेष्ठी ठरवतील, पण अशी वेळ येणार नसल्याचेही परब यांनी स्पष्ट केले आहे. मनसेने घेतलेल्या भूमिकेवर आम्ही बोलणार नाही मुंबईच्या महापौरबाबत प्रश्न विचारला असता अनिल परब म्हणाले, देवाच्या मनात काय आहे हे उद्या सकाळी 11 वाजता कळेल, असे उत्तर त्यांनी दिले आहे. त्यामुळे मुंबईच्या महापौर संदर्भात आणखी सस्पेन्स वाढला आहे. तसेच महापौर पदाचे आरक्षण जाहीर होऊ द्या, उमेदवार ठरू द्या, मग पाहू काय करायचे, असेही परब यांनी यावेळी म्हटले आहे. तसेच कल्याणमध्ये मनसेने घेतलेल्या भूमिकेवर अनिल परब यांनी बोलणे टाळले आहे. मनसेने घेतलेल्या भूमिकेवर आम्ही बोलणार नाही. तो त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे, असे परब यांनी म्हटले. दरम्यान, मुंबईत ठाकरे गटाचे 65 नगरसेवक निवडून आले असून महापौरपदासाठी शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच, नगरसेवकांच्या फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला आहे. ठाकरे गटाने बोलावलेल्या नगरसेवकांच्या महत्त्वाच्या बैठकीला आणि गट नोंदणीसाठी नवी मुंबईला रवाना झालेल्या पथकातून नगरसेविका सरिता म्हस्के या गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. म्हस्के या शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या शक्यतेने खळबळ उडाली असून, त्यांच्या या गूढ अनुपस्थितीमुळे ठाकरे गटात चिंतेचे वातावरण तर शिंदे गटाच्या पुढील हालचालींबाबतचा सस्पेन्स अधिकच वाढला आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या सरिता म्हस्के 'नॉट रिचेबल'!:म्हस्के आमच्याच संपर्कात, कुठेही गेलेल्या नाहीत; अनिल परबांचे स्पष्टीकरण
