![]()
कल्याण डोंबिवली महापालिकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने मनसेला सोबत घेऊन भाजपवर कुरघोडी केल्याचा दावा केला जात आहे. पण भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी शरद पवारांना राजकीय दृष्ट्या चित करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे कोण काय खेळी करणार? असा सवाल उपस्थित करत एकप्रकारे शिंदे गटालाच निर्वाणीचा इशारा दिला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत मनसेने शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. या माध्यमातून शिंदे गटाने भाजपवर राजकीय कुरघोडी केल्याचा दावा केला जात आहे. या घटनाक्रमावर आता भाजप नेत्यांमधून प्रतिक्रिया येत आहेत. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी या प्रकरणी उपरोक्त सूचक विधान करत महायुती सरकारमधील आपला मित्रपक्ष असणाऱ्या शिंदे गटाला निर्वाणीचा इशारा दिला आहे. काय म्हणाले प्रवीण दरेकर? प्रवीण दरेकर म्हणाले, कल्याण डोंबिवलीतील घटनाक्रम हा भाजपला धक्का असल्याचे मानण्याचे कोणतेही कारण नाही. शिवसेनेला त्यांचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आम्ही निवडणुकीपुरते एकमेकांविरोधात असतो. पण निवडणुकीनंतर शहराच्या विकासासाठी कुणी समर्थन देत असेल आणि पाठिंबा देत असेल तर घेतला जातो. शहराच्या विकासाच्या भूमिकेवर शिवसेना – शिवसेनेसोबत येणार असेल व महायुतीचा भाग बनत असेल तर त्याचे स्वागतच आहे. खरेतर भाजप – शिवसेना महायुतीचे तिथे निर्विवाद बहुमत आहे. त्यामुळे सत्ता स्थापन करण्याची कोणतीही अडचण नव्हती. पण शिवसेनेला पक्ष वाढवायचा असेल किंवा घटक पक्षांना सोबत घ्यायचे असेल तर काहीही अडचण नाही. निवडणुकीपूर्वी एकमेकांच्या पक्षातील नेते घ्यायचे नाही असे ठरले होते. ही वस्तुस्थिती आहे. तथापि, प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. पण महायुती अभेद्य असेल, असे ते म्हणाले. फडणवीसांपुढे कोण काय खेळी करणार? कल्याण डोंबवलीत स्थापन होणारी सत्ता ही महायुतीचीच असेल. भाजप एक विशाल पक्ष आहे. त्यामुळे भाजपवर कुणीही काहीही बोलू शकत नाही. भाजप लोकांच्या जीवावरचा पक्ष आहे. त्यामुळे नेत्यांच्या खेळी, डावपेच हे भाजपसाठी दुय्यम ठरतात. आमचे मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांनी एखादी खेळी केली तर काय होते हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. शरद पवारांना ज्यांनी राजकीयदृष्ट्या चित केले, त्यांच्यापुढे कोण काय खेळी करणार? असा इशाराही प्रवीण दरेकर यांनी यावेळी शिंदे गटाला दिला. यावेळी त्यांनी कुणाचेही नाव घेतले नाही. पण त्यांचा रोख एकनाथ शिंदे व त्यांच्या पक्षाकडेच होता हे स्पष्ट आहे. लोकांचा उद्धव ठाकरेंवर विश्वास राहिला नाही प्रवीण दरेकरांनी यावेळी ठाकरे गटाचे नगरसेवक नॉट रिचेबल झाल्यावरून उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला. जसा राजा तशी प्रजा. उद्धव ठाकरे जसे लोकांसाठी व त्यांच्या पदाधिकाऱ्यांसाठी नॉट रिचेबल राहतात, तसे आता नगरसेवकांची पाळी आली आहे. आता उद्धव ठाकरेंवर लोकांचा विश्वास राहिला नाही. त्यांच्याकडून विकासावर काय होईल हे सांगता येत नाही. नगरसेवक विकासाच्या बाजूने मतदारांना सामोरा गेलेला असतो. त्यातून अशा गोष्टी घडत असतात, असे ते म्हणाले.
भाजपचा एकनाथ शिंदेंना सूचक इशारा:शरद पवारांना राजकीयदृष्ट्या चित करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे कोण काय खेळी करणार?
