संतांच्या विचारांनी जीवनातील दुःख दूर होऊन स्थैर्य मिळते- राधेश्याम महाराज:आन्वा येथे वैशाख शुद्ध मोहिनी एकादशीनिमित्त वैष्णवांचा मेळा
![]()
प्रतिनिधी | आनवा कलियुगात मनुष्याला शांती आणि समाधान मिळवायचे असेल, तर संतांचा आश्रय घेणे अत्यावश्यक आहे. संतांच्या विचारांनी जीवनातील दुःख, ताणतणाव आणि अहंकार दूर होऊन मनाला स्थैर्य लाभते, असे राधेश्याम महाराज चातुर्मास्ये यांनी सांगितले. भोकरदन तालुक्यातील ‘प्रती पंढरपूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र आन्वा येथे वैशाख शुद्ध मोहिनी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त भक्तिमय वातावरणात कीर्तनसेवा संपन्न झाली. कीर्तनादरम्यान जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या “संतांचिया पायी हा माझा विश्वास” या अभंगावर महाराजांनी प्रभावी निरूपण केले. संतांवरील दृढ श्रद्धा आणि विश्वास हाच मानवाच्या उद्धाराचा खरा मार्ग आहे. “सर्वभावे दास झालो त्यांचा” या तुकोबारायांच्या वचनाचा अर्थ स्पष्ट करताना त्यांनी भक्तीचे महत्त्व अधोरेखित केले. जेव्हा भक्त आपले सर्वस्व संतांच्या चरणी अर्पण करतो, तेव्हाच त्याच्या जीवनाला खरी दिशा मिळते, या संसाराच्या धकाधकीत आणि दुःखात माणूस अनेकदा थकून जातो. अशा वेळी संतच त्याला आधार देतात. “भागलिया मज वाहतील कडे” या उक्तीचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, जशी आई आपल्या थकलेल्या लेकराला कडेवर घेते, तसेच संत आपल्या भक्ताला प्रेमाने सांभाळतात. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित भाविकांसाठी फराळाचे वाटप करण्यात आले. कीर्तनादरम्यान अभंग, गवळणी आणि हरिपाठाच्या माध्यमातून उपस्थित भाविकांना भक्तीमार्गाची गोडी लावण्यात आली. संपूर्ण परिसर हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेला होता. यावेळी भाविकांची उपस्थिती होती. आन्वा येथे भरलेला वैष्णवांचा मेळा पंढरपूरच्या वारीचीच आठवण करून देणारा संतांचे सान्निध्य हेच खरे समाधान देणारे ठरते. संतांच्या कृपेनेच परमात्मा प्रसन्न होतो, तसेच खरे सुख आणि समाधान मिळते, संपूर्ण परिसरात हरिनामाच्या गजराने आणि टाळ-मृदुंगाच्या नादाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. मोहिनी एकादशीच्या निमित्ताने श्रीक्षेत्र आन्वा येथे भरलेला हा वैष्णवांचा मेळा पंढरपूरच्या वारीचीच आठवण करून देणारा ठरला. या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून भक्तीमय वातावरणाचा आनंद घेतला. यावेळी आन्वा परिसरातील पंचक्रोशीतून शेकडो वारकरी, तरुण आणि महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.
