![]()
राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून, सातारा जिल्हा परिषदेच्या 65 जागांसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर, मसूर जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक कुलदीप क्षीरसागर यांनी जलमंदिर येथे राजेंची भेट घेऊन आपली दावेदारी मांडली. या भेटीदरम्यान उमेदवारीची मागणी करताना क्षीरसागर यांनी, “उमेदवारी द्या, नाहीतर फास घ्यायला दोरी द्या,” अशी मिश्कील टिप्पणी केल्याने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. साताऱ्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची मोठी ओढाताण सुरू आहे. मसूर जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक कुलदीप क्षीरसागर यांनी आता आपली दावेदारी प्रबळ केली आहे. यापूर्वी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा होती, मात्र उदयनराजेंच्या शब्दाखातर त्यांनी माघार घेतली होती. राजेंच्या प्रत्येक निवडणुकीत प्रचाराची धुरा समर्थपणे सांभाळणाऱ्या क्षीरसागर यांनी आता जिल्हा परिषदेसाठी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपली उमेदवारी मागितली आहे. उदयनराजेंनाही हासू आवरेना जलमंदिर पॅलेस येथे उदयनराजे भोसलेंची भेट घेत असताना कुलदीप क्षीरसागर यांनी आपल्या खास शैलीत ही मागणी केली. “आता उमेदवारी द्या, नाहीतर फास घ्यायला इथंच दोरी द्या,” अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी राजेंशी बोलताना केली. त्यांची ही उपरोधिक पण मजेशीर मागणी ऐकून खुद्द उदयनराजेंनाही आपले हसू आवरता आले नाही. निष्ठेची आणि जुन्या त्यागाची आठवण करून देत क्षीरसागर यांनी केलेल्या या विधानाची सध्या सातारा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. एकमत झाले नाही तर स्वतंत्र लढण्यास मोकळे- शिवेंद्रसिंहराजे भोसले साताऱ्यातील आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये महायुतीचे घटक पक्ष एकत्रित लढणार की स्वतंत्र, याबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. यापूर्वी पार पडलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये सर्वच पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती, त्यामुळे आता जिल्हा परिषदेसाठी महायुती काय रणनीती आखणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केले की, महायुतीत सर्वसहमतीने एकमत झाले तर चांगलीच गोष्ट आहे, मात्र तसे न झाल्यास सातारा जिल्ह्यात प्रत्येक पक्षाची स्वतःची मोठी ताकद असल्याने सर्वजण स्वतंत्रपणे लढायला मोकळे आहेत. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी बोलावलेल्या समन्वय बैठकीला उपस्थित राहण्याबाबतचा निर्णय पक्षातील सर्व नेते एकत्रितपणे घेतील, असेही शिवेंद्रराजेंनी नमूद केले. मात्र, या बैठकीतून नेमके काय निष्पन्न होईल, याचा अंदाज वर्तवणे सध्या कठीण असल्याचे त्यांनी सांगितले. जर जागावाटपाबाबत किंवा अन्य मुद्द्यांवर एकमत झाले नाही, तर प्रत्येक पक्ष आपल्या ताकदीवर निवडणूक रिंगणात उतरेल, अशी रोकठोक भूमिका त्यांनी मांडली आहे. त्यामुळे साताऱ्याच्या राजकारणात महायुतीमध्ये समन्वय राहणार की पुन्हा एकदा ‘स्वबळाचा’ नारा दिला जाणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
उमेदवारी द्या, नाहीतर फास घ्यायला दोरी द्या:उदयनराजे भोसलेंच्या कट्टर समर्थकांची अजब मागणी; उपस्थितांसह राजेंनाही हासू आवरेना
