![]()
मुंबई महानगरपालिकेच्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीत अखेर तांत्रिक बिघाडांमुळे रखडलेले दोन निकाल ‘पाडू’ (PADU – Printing Auxiliary Display Unit) या यंत्राच्या सहाय्याने निकाली काढण्यात आले आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही बंधूंनी या यं
.
मतदान यंत्रात (EVM) तांत्रिक बिघाड झाल्यास मतमोजणीत अडथळा येऊ नये, यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मुंबई महापालिकेने ‘पाडू’ यंत्राचा पर्याय निवडला होता. मात्र, मतदानाच्या काही तास आधीच या यंत्राचा वापर होणार असल्याचे जाहीर झाल्याने राजकीय वातावरण तापले होते.
“हे यंत्र म्हणजे ईव्हीएममधील डेटा चोरण्याचा किंवा त्यात फेरफार करण्याचा प्रकार आहे,” अशी टीका करत दोन्ही ठाकरे बंधूंनी याला कडाडून विरोध केला होता. मात्र, प्रशासनाने तांत्रिक पेच सोडवण्यासाठी या यंत्राचा वापर करणे अपरिहार्य असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले होते.
कुर्ला प्रभाग १५९: प्रकाश मोरे यांची सरशी
सर्वात मोठी चुरस कुर्ला येथील ‘एल’ वॉर्डमधील प्रभाग क्रमांक १५९ मध्ये पाहायला मिळाली. येथे भाजपचे प्रकाश मोरे आणि काँग्रेसचे प्रल्हाद शेट्टी यांच्यात काटाजोड लढत होती. दुसऱ्या फेरीत एका ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मोजणी थांबवण्यात आली होती. इतर सर्व मशिनची मोजणी पूर्ण झाल्यावर मोरे आणि शेट्टी यांच्यात केवळ ४८३ मतांचा फरक होता.
बिघडलेल्या मशिनमध्ये ५३१ मते होती, ज्यामुळे जय-पराजयाचे पारडे कोणत्याही बाजूला झुकू शकले असते. अखेर ‘पाडू’ यंत्राच्या सहाय्याने या ५३१ मतांची मोजणी करण्यात आली, ज्यामध्ये प्रकाश मोरे यांना अधिक मते मिळाल्याचे स्पष्ट झाले आणि त्यांना विजयी घोषित करण्यात आले.
घाटकोपर प्रभाग १२५: शिंदे गटाचे सुरेश आवळे विजयी
असाच तांत्रिक पेच घाटकोपर येथील ‘एन’ वॉर्डमधील प्रभाग क्रमांक १२५ मध्ये निर्माण झाला होता. येथेही ईव्हीएम सुरू होत नसल्याने मतमोजणीमध्ये अडथळा निर्माण झाला होता. उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये तणावाचे वातावरण असताना प्रशासनाने ‘पाडू’ यंत्राचा आधार घेतला. या यंत्राद्वारे आकडेवारी स्पष्ट झाल्यानंतर शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार सुरेश आवळे यांनी विजय संपादन केल्याचे जाहीर करण्यात आले.
भविष्यातील राजकीय संघर्षाची नांदी
तांत्रिक अडथळ्यांमुळे रखडलेले कुर्ला आणि घाटकोपर येथील निकाल ‘पाडू’मुळे मार्गी लागले असले, तरी या यंत्राच्या वापरामुळे विरोधकांच्या हाती नवीन कोलीत मिळाले आहे. “ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड होतोच कसा आणि त्यात ‘पाडू’सारख्या बाह्य यंत्राचा हस्तक्षेप का केला जातो?” असा सवाल आता विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसांत या यंत्राच्या विश्वासार्हतेवरून न्यायालयीन लढाई किंवा मोठे राजकीय आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
