![]()
नागपूर महापालिकेत विजय मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी विजयी नगरसेवकांचे अभिनंदन करण्यासाठी एकत्र आले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला तसेच गडकरी यांनी नागपूरला सुंदर आणि प्रदूषणमुक्त शहर बनवायचे असल्याचे निर्देश नवनिर्वाचित नगरसेवकांना केले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, नागपूरच्या जनतेने मोठा विजय आपल्याला दिला आहे. महाराष्ट्रात एकूणच भाजपने या निवडणुकीत मोठा रेकॉर्ड केला आहे आणि 29 पैकी 25 महापालिकांमध्ये आपली सत्ता आली आहे. महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष भाजपच आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. मी सगळ्यांचे अभिनंदन करतो. मला विश्वास आहे, येत्या काळात विकासाचा अजेंडा जो आहे, तो आपण वेगाने पुढे नेऊ. नितीन गडकरी म्हणाले, आपल्या नागपूरमध्ये यश मिळाले आहे, आपल्या शहरात जे काही उत्तम कार्य आपण केले, त्याचा परिणाम म्हणून आपल्याला चांगले यश मिळाले आहे. आपण आश्वासन दिले आहे की प्रदूषणमुक्त शहर आपण तयार करणार आहोत. ही वचने आपल्याला पूर्ण करायचे आहे. या निवडणुकीत आपल्या कार्यकर्त्यांनी, आमदारांनी उत्तम काम केले आहे. पुढे बोलताना नितीन गडकरी म्हणाले, नागपूर शहरात, विदर्भात आणि महाराष्ट्रात चंद्रशेखर बावनकुळे यांनी खूप काम केले आहे. त्यांनी परिश्रम करून विजय मिळवून दाखवला आहे. येणाऱ्या काळात जसा आपल्याला आनंद आहे, तशी जबाबदारी वाढली आहे. जे नगरसेवक निवडून आले आहेत, जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत, जे प्रश्न आहेत, ते सोडवायचे आहेत. हा विजय आपल्या पक्षाचा नेत्रदीपक विजय आहे. आता पुन्हा एकदा आपल्याला संधी मिळाली आहे. हा विजय आपल्याला नम्रपणे स्वीकारायचा आहे. जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करायच्या आहेत, असे आवाहन गडकरी यांनी केले आहे. यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी मोठा विजय मेळावा आयोजित करण्याचे आवाहन केले. तसेच या कार्यक्रमात संगीत आणि जेवणाची मेजवानी माझ्याकडून असेल, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
नागपूरला प्रदूषणमुक्त शहर बनवायचेय:सर्व आश्वासने पूर्ण करायची आहेत, नितीन गडकरींच्या विजयी नगरसेवकांना सूचना
