![]()
राज्यातील 29 महापालिका निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत. मुंबईत भाजप आणि शिवसेना युती आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचे देखील बऱ्यापैकी जागा येताना दिसत आहेत. एकूणच येथील निवडणूक ही अटीतटीची दिसून येत आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले, दुपारी 3 नंतर जे निकाल यायला सुरुवात झाली त्यातले 80-85 टक्के निकाल हे शिवसेनेच्या विजयाच्या आहेत. अनेक ठिकाणी आघाडीवर आहोत. नक्कीच अटीतटीची लढत आहे. काटे की टक्कर आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुद्धा उमेदवार विजयी होत आहेत. त्यांचाही आकडा वाढत आहे. अशा वेळेला तुम्ही आव्हाणांची भाषा करत आहात. मुंबईची लढाई इतर महापालिकांपेक्षा वेगळी आहे, इथली लढाई आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत लढणार. अजून लढाई संपली नाही. पूर्ण निकाल हाती आल्यानंतर मग आपण बोलू. शिवसेना फुटली नसती तर 120-15 जागांवर जिंकली असती पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, शिवसेना फोडून हा विजय ते मिळवत आहेत. शिवसेना फुटली नसती तर 120-15 जागांवर जिंकली असती आणि भाजपचा खेळ 50-60 मध्ये संपला असता. मराठी माणूस हा आजही ठाकरेंच्याच मागे आहे. मुंबईवर महापौर बसवण्यासाठी शिवसेना फोडली. महाराष्ट्राचे मराठी माणसाच्या एकजुटीला सुरुंग लावला. पण मराठी माणूस हा ठाकरेंच्याच पाठीशी आहे, हे तुम्हाला निकालानंतर दिसेल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. त्यांच्या विजायला आम्ही निर्भीड विजय मानत नाही एमआयएमचे 6 नगरसेवक निवडून आले आहेत, यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, एमआयएमला भाजपने ताकद दिली. काही मुस्लिमांची मते आमच्याकडे वळणार असते, तर ते वळू नयेत म्हणून यांनी पायघड्या घातल्या. तसेच पुणे सारख्या ठिकाणी सुद्धा भाजप आघाडीवर आहे, यावर बोलताना राऊत म्हणाले, भाजपच्या हातात जर फ्रांसचा जरी निवडणूक आयोग असता, तर हे तिकडे पण जिंकले असते. त्यांचा सगळा जोर यंत्रणा हायजॅक करण्यावर आहे. त्यांच्या विजायला आम्ही निर्भीड विजय मानत नाही. निवडणूक आयोग नेमताना विरोधी पक्षाला विश्वासात घ्यावे, पण केंद्रात नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हे अशा प्रकारचे लोकशाहीला रुचेल पचेल असे कोणतेही सत्कार्य करणार नाही, असे राऊत म्हणाले. ज्याच्या हातात निवडणूक आयोग असतो, ताटाखालचे मांजर झालेले असते अन ज्याच्या हातात यंत्रणा विकत घ्यायची ताकद असते ते कोणताही विजय मिळवू शकतात, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.
शिवसेना फुटली नसती तर 120-125 जागांवर जिंकली असती:मुंबईसाठी आम्ही शेवटच्या श्वासपर्यंत लढत राहणार- संजय राऊत
