![]()
आदित्य ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जाणारे ज्येष्ठ नेते सचिन अहिर यांनी नुकताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. शिंदे गटात जाताच त्यांची विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे. मात्र, या अचानक केलेल्या पक्षांतरावरून अहिर यांच्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका केली जात आहे. या सर्व टीकेला आणि तिरस्काराला आता सचिन अहिर यांची मुलगी किरण अहिर हिने एका भावनिक व्हिडीओच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. किरण अहिर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत आपल्या वडिलांवर होणाऱ्या आरोपांचा समाचार घेतला आहे. व्हिडीओमध्ये बोलताना किरण म्हणाल्या, “माझ्या वडिलांनी पक्ष सोडला म्हणून सध्या त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे आणि त्यांचा तिरस्कार केला जात आहे. त्यांना पक्षात एवढी पदे मिळाली असतानाही त्यांनी पक्ष का सोडला? असे प्रश्न सातत्याने विचारले जात आहेत.” “पक्षाने आम्हाला जे काही दिले आहे, त्याचा मी नक्कीच सन्मान करते. मात्र, आमच्यासाठी राजकारण हे केवळ राजकारण नसून ती खऱ्या अर्थाने जनसेवा आहे,” अशी स्पष्ट भूमिका त्यांनी या व्हिडीओतून मांडली. २०१९ ला आदित्य ठाकरेंना दिली होती साथ सचिन अहिर यांच्या राजकीय निष्ठेची आठवण करून देताना किरण यांनी सांगितले की, “माझ्या वडिलांनी २०१९ मध्ये आदित्य ठाकरे यांच्यासाठीच आपला पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सोडला होता आणि त्यांना खंबीर साथ दिली होती. त्यांनी पक्षात अतिशय निष्ठेने आणि मेहनतीने काम केले. त्यांच्या याच प्रामाणिक कामाचे फळ आता त्यांना मिळाले आहे.” सध्या सोशल मीडियावर किरण अहिर यांचा हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत असून राजकीय वर्तुळात त्याची जोरदार चर्चा रंगली आहे. पदे उपकार म्हणून दिली जात नाहीत किरण अहिर म्हणाल्या, “अनेक जण म्हणतात की पक्षाने माझ्या वडिलांना खूप काही दिले. त्या मताचा मी पूर्ण आदर करते. पण त्याचबरोबर एक प्रश्न विचारायलाही हवा. जर माझे वडील त्या जबाबदाऱ्यांसाठी पात्र नसते, जर त्यांनी अनेक वर्षे प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि अथक परिश्रमाने काम केले नसते, तर त्यांच्यावर इतक्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या असत्या का? पदे ही कोणावर उपकार म्हणून दिली जात नाहीत. ती कठोर परिश्रम, क्षमता, नेतृत्वगुण आणि कालांतराने मिळवलेल्या विश्वासाच्या बळावर मिळवावी लागतात.” व्यक्तीचा संपूर्ण प्रवास समजून घेणेही महत्त्वाचे किरण अहिर म्हणाल्या, “प्रत्येक नातं हे दोन्ही बाजूंनी जपलं जातं. जसा पक्षाने माझ्या वडिलांवर विश्वास ठेवला, तसाच माझ्या वडिलांनीही अनेक वर्षे प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि पूर्ण समर्पणाने त्यांच्यावर सोपवलेल्या प्रत्येक जबाबदारीचे पालन केले. म्हणूनच, एखाद्या राजकीय निर्णयावर मत व्यक्त करण्यापूर्वी किंवा त्याचा न्याय करण्यापूर्वी, तो निर्णय घेणाऱ्या व्यक्तीचा संपूर्ण प्रवास समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.” कोण आहेत सचिन अहिर? सचिन अहिर हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अत्यंत अभ्यासू, अनुभवी आणि सक्रिय नेते म्हणून ओळखले जातात. अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटात प्रवेश करून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला एक नवी आणि भक्कम दिशा दिली आहे. अहिर यांच्या प्रवेशामुळे आणि त्यांच्या विधानपरिषदेच्या उपसभापती पदावरील बिनविरोध निवडीमुळे वरिष्ठ सभागृहात शिंदे गटाची ताकद लक्षणीयरीत्या वाढली आहे. शिंदे गटातील अनेक नेते या घटनेकडे पक्षाला लागलेली ‘लॉटरी’ म्हणून पाहत आहेत. दुसरीकडे, एका अत्यंत अनुभवी आणि अभ्यासू आमदाराने ऐन मोक्याच्या क्षणी साथ सोडल्याने उद्धव ठाकरे गटासाठी हा एक मोठा आणि अनपेक्षित धक्का मानला जात आहे.
वडिलांनी 2019 मध्ये आदित्य ठाकरेंसाठी पक्ष सोडला:आता निष्ठेचे फळ मिळाले, सचिन अहिर यांच्या पक्षबदलावर लेकीचा भावनिक व्हिडीओ
