![]()
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सातारा ड्रग्ज प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या क्लीनचिटवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. साताऱ्यात सरकारच्या आशीर्वादाने ड्रग्जचा धंदा सुरू होता. पण मुख्यमंत्री कोणत्याही तपासाशिवा
.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सातारा ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंवर होणारे आरोप जोरकसपणे फेटाळून लावलेत. प्रस्तुत प्रकरणात आतापर्यंत हाती लागलेल्या पुराव्यांमध्ये एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या कुटुंबाचा कोणताही संबंध दुरान्वयेही आढळला नाही. त्यामुळे त्यांच्यावर होणारे आरोप चुकीचे व निषेधार्ह आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी त्यांच्या या क्लीनचिटवर जोरदार हरकत घेतली आहे. तसेच या सरकारच्या मंत्र्यांवर सातत्याने भ्रष्टाचाराचे डाग लागत असल्याचा आरोप केला आहे.
सरकारचे भ्रष्टाचार करणाऱ्यांना संरक्षण
अंबादास दानवे म्हणाले, माणिकराव कोकाटेंचे अजून सदस्यत्व रद्द झाले नाही. त्यांनी जनतेच्या दबावामुळे मोठ्या मुश्किलीने आपला राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा घेण्यात आला नाही. त्यांनी दिला. यामुळे हे सरकार भ्रष्टाचार करणाऱ्यांना, सदनिकांचे गैरव्यवहार करणाऱ्यांना अशा पद्धतीने संरक्षण देते की काय? अशी स्थिती आहे. या राज्याच्या मंत्र्यांवर वेगवेगळ्या पद्धतीने डाग लागत आहेत. भ्रष्टाचाराचे डाग लागत आहेत. तिकडे संजय शिरसाट यांच्या व्हिट्स हॉटेल प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. इकडे माणिकराव कोकाटे यांना पोलिसांना अटक करावीच लागेल.
अशा प्रकरणात एखाद्या सर्वसामान्य माणसाला शिक्षा झाली असती तर पोलिस त्यांना कोर्टातूनच घेऊन जात असतात. परंतु कोर्टाने शिक्षा ठोठावल्यानंतर 3-4 दिवस झाल्यानंतरही माणिकराव कोकाटेंवर कोणतीही कारवाई झाली नाही, असे दानवे म्हणाले.
रावसाहेब दानवे अन् संजय शिरसाट यांच्यावर निशाणा
भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरेंची ही शेवटची निवडणूक असल्याची टीका केली आहे. अंबादास दानवे यांनी यावेळी त्यांचाही समाचार घेतला. रावसाहेब दानवे यांची शेवटची निवडणूक झालेली आहे. त्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शेवटच्या निवडणुकीची चिंता करू नये, असे ते म्हणाले. या प्रकरणी त्यांनी मंत्री संजय शिरसाट यांचाही समाचार घेतला. ते म्हणाले, आमची शेवटची असेल किंवा पहिली निवडणूक असेल. तुमचे काय खरे आहे? तुम्ही कोणत्या पक्षात आहात? उद्या अमित शहा सांगतील तिथे तुम्हाला जावे लागेल. उद्या तुमच्या पक्षाचा व चिन्हाचा सुप्रीम कोर्टात प्रश्न आहे. तुमचा पक्षच राहतो की नाही प्रश्न आहे. निवडणुका तर खूप लांबचा मुद्दा आहे.
मुख्यमंत्री दुरान्वयेही संबंध नाही असे कसे काय म्हणू शकतात
अंबादास दानवे यांनी सातारा ड्रग्ज प्रकरणावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांची पाठराखण करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही शरसंधान साधले. ते म्हणाले, मुख्यमंत्री एकीकडे माणिकराव कोकाटेंना वाचवत आहेत. तर दुसरीकडे, सुषमा अंधारे यांनी पुराव्यानिशी सत्य घटना सांगितली आहे. त्यांनी या प्रकरणात एकनाथ शिंदेंच्या भावाचा समावेश असल्याचे पुरावे दिलेत. असे असताना दुरान्वयेही संबंध नाही असे मुख्यमंत्री कसे काय म्हणू शकतात. ड्रग्ज आढळले त्या ठिकाणी सातारा पोलिस पोहोचत नाहीत, थेट मुंबई पोलिस पोहोचतात याचा अर्थ काय घ्यायचा?
साताऱ्यात सरकारच्या आशीर्वादाने ड्रग्ज व्यवसाय
अंबादास दानवे म्हणाले, साताऱ्याचे पोलिस या सर्व ड्रग्ज व्यवसायाला सपोर्ट करत होते. तिथे ड्रग्ज व्यवसाय सुरू होता. तिथपर्यंत जाण्यासाठी 75 लाखांचा रस्ता बांधण्यात आला. तिथे लोकवस्तीही नव्हती. आपल्याकडे लोकवस्तीला अजून रस्ते नाहीत. पाणंद रस्त्याला एक रुपया मिळत नाही. पण जिथे लोकच राहत नाहीत, तिथे 75 लाख रुपयांचा रस्ता का होतो? याचा अर्थ हा ड्रगचा व्यवसाय सरकारच्या आशीर्वादाने सुरू होता. एकनाथ शिंदे यांच्या गावाजवळचे हे गाव आहे. त्यात त्यांच्या बंधूंचे नाव आले आहे.
मुख्यमंत्री कोणत्याही तपासाशिवाय स्वतःच क्लीनचिट देत आहेत. मागे त्यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांना दिली. आता शिंदेंना दिली. मुख्यमंत्री स्वतः तपास अधिकारी झाले की काय? हा प्रश्न आहे, असे ते म्हणाले.
