![]()
मेळघाटातील निवडक आदिवासी बांधवांनी नुकतीच दिल्लीतील संसद भवनाला भेट दिली. अमरावतीचे काँग्रेस खासदार बळवंतराव वानखडे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवण्यात आला. या भेटीदरम्यान, आदिवासी बांधवांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी आणि संघटन
.
ज्यांनी आयुष्यात जिल्हाधिकारी किंवा जिल्हा परिषदेचे कार्यालयही पाहिले नव्हते, अशा अनेक आदिवासी बांधवांना थेट दिल्लीत संसद भवन पाहण्याची संधी मिळाली. या अनुभवामुळे ते भारावून गेले असून, अनेकांनी ‘जीवनात पहिल्यांदाच राजधानी दिल्ली अनुभवली’ अशी भावना व्यक्त केली.
संसद भेटीसाठी मेळघाटातील प्रत्येक गावातून आदिवासी बांधवांची निवड करण्यात आली होती. खासदार बळवंतराव वानखडे आणि माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या अभिनव संकल्पनेतून त्यांना दिल्लीपर्यंतचा प्रवास आणि ‘संसद दर्शन’ घडले.
या दौऱ्यादरम्यान, आदिवासी बांधवांनी प्रियंका गांधी आणि के.सी. वेणुगोपाल यांच्याशी अनौपचारिक चर्चा केली. चर्चेदरम्यान, आदिवासी बांधवांनी आपले गाऱ्हाणे आणि भावना नेत्यांसमोर मांडल्या. यावेळी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी मेळघाटला दिलेल्या भेटीच्या आठवणींनाही उजाळा देण्यात आला.
खासदार बळवंतराव वानखडे यांनी या उपक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “मेळघाट हा निसर्गरम्य असला तरी अतिशय दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. येथील अनेक नागरिक आजही बाहेरील जगापासून अलिप्त आहेत. अशा बांधवांना देशाच्या लोकशाहीचे मंदिर पाहता यावे आणि जगाशी त्यांचा संपर्क वाढावा, ही खासदाराची जबाबदारी समजून मी हा पुढाकार घेतला.”
वानखडे पुढे म्हणाले की, “हा उपक्रम केवळ एक सहल नसून, दुर्गम भागातील जनतेला देशाच्या सर्वोच्च सभागृहाची ओळख करून देणारा ‘सामाजिक उत्तरदायित्व’ ठरला आहे.”
या दौऱ्यात जि.प. चे माजी सभापती दयाराम काळे, चिखलदरा काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष सहदेव बेलकर, युवक काँग्रेसचे पुढारी राहुल येवले, धारणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राहुल येवले, चिखलदरा तालुका अनुसूचित जाती काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मेहपतसिंग उईके, संजय बेलकर, राजेश सेमलकर, मेळघाट विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष पियुष मालवीय, नानकराम ठाकरे, तोताराम कास्देकर, सोनाजी कास्देकर, शिकारी बेठेकर, तसेच चिखलदरा काँग्रेस कमिटीचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
