![]()
चांदूरबाजार तालुक्यातील मौजा शिरजगाव बंड येथील कित्येक वर्षांपासूनचा नैसर्गिक पावसाळी पाण्याचा प्रवाह अडवण्यात आला आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली असून, शेतात पाणी साचून पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. शिरजगाव बंड-चांदूरबाजार मार्गालगत असलेला हा नाला काही शेतकऱ्यांनी जेसीबीच्या साहाय्याने माती टाकून बंद केल्याचा आरोप ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी केला आहे. या नाल्याद्वारे शेतातील तसेच डांबरी रस्त्यावरील पावसाचे पाणी नैसर्गिकरीत्या वाहून जात होते. नाला बंद झाल्यामुळे पावसाचे पाणी शेतात साचून पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच, हे पाणी शेजारील वसाहतीत आणि शिरजगाव बंड-चांदूरबाजार मार्गावर साचल्यास नागरिकांना व वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर, शेतकरी व ग्रामस्थांनी प्रशासनाकडे लेखी निवेदन दिले आहे. त्यांनी पावसाळ्यापूर्वी संबंधित नाल्याची प्रत्यक्ष पाहणी करून नैसर्गिक पाणी वाहून जाण्याचा मार्ग तातडीने मोकळा करावा, अशी मागणी केली आहे. याबाबत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले असून, वेळीच उपाययोजना न केल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होईल, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना हेमंत तडस, चंद्रप्रकाश रघुवंशी, पंकज झटाले, कमल सारडा, शरद टाक, निलेश झटाले, सुधीर भुसारी, संदीप घाटोळ, सतीश घाटोळ आदी शेतकरी उपस्थित होते.
शिरजगाव बंड येथे नैसर्गिक नाला बंद:शेतात पाणी साचण्याची भीती; शेतकऱ्यांची प्रशासनाकडे कारवाईची मागणी
