![]()
कोल्हापूर शहरात सध्या सुरू असलेल्या 100 कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी रस्ते प्रकल्पावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी या प्रकल्पाच्या कामावर गंभ
.
विधान परिषदेत बोलताना सतेज पाटील यांनी कोल्हापुरातील 100 कोटी प्रकल्पांची चौकशी होणे गरजेचे असल्याचे नमूद केले. रस्त्यांच्या निकृष्ट दर्जावरून सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल झाली असून, कामावरून ताशेरे ओढले गेल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, उपमुख्यमंत्री महोदयांनी चांगल्या मनाने निधी मंजूर करून शंभर कोटी दिले यासाठी मी त्यांचे आभार मानतो, मात्र रस्त्यांची गुणवत्ता राहिली आहे का? याचा विचार करण्याची गरज आहे. 100 कोटी दिले असले, तरी 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत हे वास्तव आहे. त्यांनी पुढे असाही टोला लगावला की, मी राजकीय आरोप करत नाही, मात्र 100 कोटींच्या रस्त्यांची अवस्था काय आहे? पुढील पावसाळ्यापर्यंतही हे रस्ते टिकणार नाहीत. महापालिकेच्या निवडणुकीपर्यंत मतदानापर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता मानवी लागेल.
पाटलांनी स्वतःचे उद्योग, बाकी काहीच केले नाही- राजेश क्षीरसागर
सतेज पाटलांच्या या आक्रमक भूमिकेवर आमदार राजेश क्षीरसागर यांनी पलटवार केला. क्षीरसागर म्हणाले की, सतेज पाटलांना माझे खुले आव्हान आहे. कुठल्याही मंचावर या, सर्व प्रश्नांना उत्तर द्यायला आम्ही तयार आहोत. ते पुढे म्हणाले की, आम्ही किती प्रकल्प आणले आणि तुम्ही किती प्रकल्प आणले, याची तुलना करायला तयार आहोत. पाटलांनी फक्त स्वतःचे उद्योग वाढवले, बाकी काहीच केले नाही, अशी टीका क्षीरसागर यांनी केली.
दरम्यान, कोल्हापुरातील प्रमुख मार्गांवर 100 कोटींमधून कामे सुरू आहेत, परंतु पहिल्याच पावसात या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी रस्ते करताना अर्धवट स्थितीत काम केल्याने कामाचा दर्जा खालावला असून, पावसाळा संपल्यानंतर केलेल्या रस्त्यांवर आता नव्याने सीलकोट करण्याची वेळ आली आहे. या राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे आता 100 कोटींच्या रस्ते प्रकल्पाच्या गुणवत्तेचा मुद्दा शहरात पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
