![]()
दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात अमरावती जिल्ह्यातील महिलांद्वारे संचालित केला जाणारा फूड स्टॉल.
अमरावती जिल्ह्यातील महिला बचतगटांनी सुरू केलेला खास वऱ्हाडी जेवणाचा थाट दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात पोहोचला आहे. ‘द फ्लेवर्स ऑफ महाराष्ट्र’ नावाचा हा थाट दर्यापूर तालुक्यातील तेलखेडा येथील बचत गटाचा आहे. यासाठी तेथील ७ महिलांची चमू कार्यरत असून, त्या
.
या राष्ट्रीय खाद्य महोत्सवात तेलखेड्याचा महिला बचत गट अमरावती जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत आहे. त्यांच्या ‘द फ्लेवर्स ऑफ महाराष्ट्र’ मध्ये रोडगे, बिट्ट्या, मांडे थाळी, पुरणपोळी, कढीगोळे, सर्गुंडे, विदर्भ स्पेशल चिकन आणि खास वऱ्हाडी मटन यांसारख्या विशेष पदार्थांचा समावेश आहे. नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त कार्यालयातर्फे या फूड फेस्टीव्हलसाठी ‘द फ्लेवर्स ऑफ महाराष्ट्र’ ला आमंत्रित करण्यात आले होते.
महाराष्ट्राच्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या पारंपरिक पाकसंस्कृतीची राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण करण्याच्या उद्देशाने या महिला बचत गटाला दिल्लीला पाठवण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित झालेल्या ‘वैदर्भी ब्रँड’ अंतर्गत, तेलखेडा येथील आनंदी स्वयं सहाय्यता समूहाची यासाठी निवड करण्यात आली.
या महोत्सवात दिल्लीतील नागरिक, दिल्ली-एनसीआरमधील महाराष्ट्रीयन समुदाय, तसेच देश-विदेशातील राजनैतिक प्रतिनिधी, शासकीय अधिकारी आणि मीडिया प्रतिनिधी असे हजारो पाहुणे सहभागी झाले आहेत. पर्यटनवाढ आणि सांस्कृतिक राजनैतिक संवाद दृढ करण्याच्या राज्य शासनाच्या उद्दिष्टांना पूरक असा हा उपक्रम आहे.
या सहभागामुळे जिल्ह्यातील एका बचतगटाच्या महिलांना राष्ट्रीय स्तरावरील व्यवसाय, मार्केटिंग, खाद्य प्रदर्शन आणि ब्रँड प्रमोशनची अनमोल संधी उपलब्ध झाली आहे. यामुळे त्यांच्या उद्योजकतेला चालना मिळून आर्थिक सक्षमीकरणाचा मार्गही अधिक बळकट होणार आहे.
या बचतगटाने पहिल्याच दिवशी उत्तम विक्री नोंदवली. व्हेज स्टॉलच्या माध्यमातून २६ हजार ५६० रुपये आणि मांसाहारी स्टॉलच्या माध्यमातून ७ हजार २३० रुपये अशी एकूण ३३ हजार ७८९ रुपयांच्या खाद्य पदार्थांची विक्री झाली. उर्वरित दोन दिवसांतही याहून अधिक विक्रीचा अंदाज आहे.
