नांदेड – सामाजिक वनीकरण विभागातील वर्षानुवर्षे कायम रोजंदारीवर काम करणाऱ्या, तसेच न्यायालयाने कामावरून कमी न करण्याचे स्पष्ट आदेश दिलेल्या कामगारांना तात्काळ कामावर रुजू करून घ्यावे, या प्रमुख मागणीसाठी शासकीय औद्योगिक कामगार संघटनेने 16 डिसेंबरपासून सामाजिक वनीकरण कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.
नायगाव, देगलूर, बिलोली, मुखेड, धर्माबाद आणि हदगाव आदी विभागांमध्ये 1992-93 पासून कार्यरत असलेल्या कायम रोजंदारी कामगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत संघटनेतर्फे अनेकवेळा पत्रव्यवहार आणि आंदोलन करण्यात आले. मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आली असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
कामगारांना तात्काळ कामावर घेऊन न्याय मिळावा, या मागणीसाठी 16 डिसेंबरपासून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला असून याबाबतचे निवेदन विभागीय वन अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
या निवेदनावर कामगार नेते ऍड. कॉ. प्रदीप नागापूरकर, कॉ. शिवाजी फुलवळे, कॉ. अब्दुल गफार यांसह अन्य पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
