महाराष्ट्रात वाढणार उष्णतेची तीव्रता आणि अतिवृष्टी:30 वर्षांत 2 अंशांपर्यंत तापमान वाढीचा ‘सीएसटीइपी’चा इशारा
![]()
‘सेंटर फॉर सायन्स, टेक्नोलॉजी अँड पॉलिसी’ (सीएसटीइपी) या संशोधन संस्थेने भारतीय हवामान विभाग आणि आयपीसीसीच्या आकडेवारीचा अभ्यास करून एक अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार, 2021 ते 2050 या काळात महाराष्ट्रातील उन्हाळा आणि हिवाळ्यातील सरासरी तापमान 1 ते 2 अंश सेल्सिअसने वाढणार आहे. तसेच, पावसाचे दिवस आणि अतिवृष्टीच्या घटनांमध्येही मोठी वाढ अपेक्षित आहे. वाढत्या वायू प्रदूषणामुळे हे बदल घडणार असल्याचे अहवालात नमूद केले आहे. हवामान अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी या अहवालातील गंभीर इशाऱ्यांकडे लक्ष वेधले आहे. भारत आधीच नैसर्गिक आपत्ती निर्देशांकात तिसऱ्या क्रमांकावर असल्याने, हा अभ्यास भविष्यातील धोक्याची घंटा मानला जात आहे. अहवालानुसार, प्रदूषण असेच वाढत राहिल्यास 2050 पर्यंत सर्वाधिक तापमान वाढ अमरावती व संभाजीनगर (2.9 अंश सेल्सिअस), जालना (2.7 अंश सेल्सिअस), भंडारा (2.6 अंश सेल्सिअस), तर अकोला, जळगाव व नंदुरबार येथे 2.5 अंश सेल्सिअसने होईल. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना याचा मोठा फटका बसेल. राज्यातील सर्वाधिक तापमान असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात 2021 ते 2030 दरम्यान उष्ण लहरींचे दिवस काही प्रमाणात कमी होतील. मात्र, 2030 ते 2050 दरम्यान येथे अत्याधिक तीव्रतेच्या उष्ण लहरी वाढतील. याउलट, मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तापमान वाढ तुलनेने कमी असेल. यवतमाळ वगळता राज्यातील सर्वच जिल्ह्यांत पावसाचे दिवस 3 ते 9 दिवसांनी वाढतील. यामध्ये वाशीम (9 दिवस) आणि जालना (8 दिवस) आघाडीवर असतील. अति प्रदूषणाच्या स्थितीमध्ये मुंबईत 7 टक्के तर पुण्यात पावसाचे प्रमाण तब्बल 34 टक्के वाढेल, असेही अहवालात म्हटले आहे. सरासरी पावसाच्या या वाढीमुळे धुळे, सातारा, सांगली, अहमदनगर आणि पुणे यांसारख्या दुष्काळग्रस्त जिल्ह्यांना काहीसा दिलासा मिळू शकतो. मात्र, दुसरीकडे सिंधुदुर्ग, बुलढाणा, हिंगोली, कोल्हापूर आणि मुंबईसह अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टीच्या (100 मिमी पेक्षा जास्त पाऊस) 3 ते 8 गंभीर घटना घडतील, ज्यामुळे महापुराचा धोका वाढेल. या बदलत्या हवामानाचा थेट फटका खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांना बसून पिकांची नासाडी व रोगराई वाढेल. जंगलांमध्ये वणवे लागण्याचे प्रमाण वाढेल आणि वन्यजीवांचे आरोग्य धोक्यात येईल. वाढत्या उष्णतेमुळे मानवी आरोग्यावर परिणाम होऊन मृत्यूदर वाढू शकतो. तसेच अतिवृष्टीमुळे रस्ते, पूल, वीजवाहिन्या आणि दूरसंचार यांसारख्या पायाभूत नागरी सुविधांचे अतोनात नुकसान होण्याची शक्यता आहे.
