कांदा प्रश्नी आज महाविकास आघाडीचा मोर्चा:पुणे-नाशिक महामार्गावर शेतकऱ्यांनी कांदे फेकले, तातडीने तोडगा काढला पाहिजे- रोहित पवार
![]()
राज्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. तसेच भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा कांदा तसाच पडलेला असून अक्षरशः फेकून देण्याची वेळ आली आहे. कांद्याच्या या मुद्द्याला राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी चांगलाच लावून धरला आहे. आज महाविकास आघाडीतर्फे मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी शेतकऱ्यांना विनंती केली आहे. मंचर येथे महाविकास आघाडीकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी क्रांती मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार, नीलेश लंके यांच्यासह मविआच्या नेत्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घातल्या होत्या. तसेच शेतकऱ्यांनी कांद्याचे पोते रस्त्यावर रिकामे केले. आज मंत्रिमंडळाची बैठक होणार असून, या बैठकीत शेतकऱ्यांसाठी काय तोडगा निघणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. तसेच तोडगा निघत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचे रोहित पवारांनी म्हटले आहे. रोहित पवार म्हणाले, निवडणुकीसाठी फक्त नाटके केले जातात. नाफेडच्या किंमतीला कांदा विकला जात होता. मार्केट कमिटीमध्ये कांदा घेण्याची आमची मागणी होती, ते मान्य जरी झाले असले तरी अजून अंमलात आणले गेले नाही. रोहित पवार म्हणाले, 10 जून आम्ही वाट पाहणार नाही. डबल इंजिन सरकार आहे, मग घ्या न निर्णय लगेच. अमाचे मुडदे पाडण्याचे मुहूर्त बघत आहेत का? असा सवाल पवारांनी उपस्थित केला. आम्ही जर सहन करत राहिलो तर न्याय कधी मिळणार? दिलीप वळसे पाटलांनी शेतकऱ्यांना चर्चा करण्याची विनंती केली आहे. त्यावर बोलताना रोहित पवार म्हणाले, तुम्हाला कोणी अडवले आहे? तुम्ही सत्तेत आहात. शेतकऱ्यांसाठी भूमिका घेणे महत्त्वाचे आहे. फक्त बोलून काही होत नाही. दिलीप वळसे पाटलांची शेतकऱ्यांना विनंती दिलीप वळसे पाटील म्हणाले, आंदोलन करणारे जे आहेत, त्यांना माझी एवढीच विनंती आहे की, सरकारतर्फे ज्या उपायोजना केल्या जात आहेत, जी पावले टाकली जात आहेत. त्यात आणखी सुधारणा करायच्या असतील तर माझी त्यांच्याशी चर्चा करण्याची तयारी आहे. तसेच आंदोलन संपल्यावर ते माझ्याकडे आले, तर मला त्यांचे आदिरातिथ्य करता येईल. त्यांच्या ज्या मागण्या आहेत, त्यात काही सुधारणा करता येऊ शकतात. तुम्ही मला आंदोलनाच्या ठिकाणी बोलावले तर कुठलीही गोष्ट मनात न ठेवता शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्यायला तयार आहे. आमचे प्रामाणिक प्रयत्नस सुरु आहेत. यात स्वार्थ नाही. आर्थिक मंदी येते, तेव्हा शेती क्षेत्र देशाच्या जीडीपीमध्ये भर घालू शकते. युद्धाचा परिणाम अर्थव्यवस्थेवर झालाय पुढे बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले, माझी सर्व शेतकरी बंधुंना हीच विनंती आहे की, आपण येणारे वर्ष जे आहे, वेधशाळेने जो अंदाज वर्तवलाय पावसाची संभाव्यता कमी आहे. एल निनोचा प्रभाव वाढला आहे. पाऊस कमी पडला, अधिकृत यंत्रणा आहेत त्यांनी सांगितलय साधरणत: 90 टक्के इतका पाऊस पडेल. त्यामुळे दृष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांनी पीक नियोजन करताना ऊस, कांदा किंवा अन्य नगदी पिकांचे नियोजन करताना या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. आखातामध्ये युद्ध सुरु आहे. त्या युद्धाचा परिणाम केवळ भारताच्याच नाही, तर जगाच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. शेतकऱ्यांच्या मागणीसाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील आखाताच्या युद्धाचा महाराष्ट्र, भारतात सुद्धा परिणाम होणार आहे. किंमती वाढणे, आर्थिक टंचाई येणे, मंदी येणे या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. अर्थात शेतकऱ्यांना हा सल्ला देण्याचे कारण नाही. शेतकऱ्यांसंदर्भातील उपायोजना राज्य सरकार, केंद्र सरकारने केल्या पाहिजेत. शेतकऱ्यांच्या मागणीसाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील आहोत, असेही दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.
