अब्दुल सत्तार-अंबादास दानवे आमनेसामने; गळाभेटीनंतर विलीनीकरणाच्या चर्चांना नवे बळ:समृद्धीवर योगायोग की संकेत?

0
ezgifcom-animated-gif-maker-2026-06-02t135355890_1780388724.gif




शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना सोमवारी आणखी खतपाणी मिळाल्याचे चित्र दिसून आले. ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे आणि शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांची समृद्धी महामार्गावर अचानक भेट झाली. विशेष म्हणजे, अवघ्या एक दिवसापूर्वी दोन्ही नेत्यांनी शिवसेनेचे दोन गट भविष्यात एकत्र यावेत, असे मत व्यक्त केले होते. त्यामुळे त्यांच्या या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले होते. भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी एकमेकांची गळाभेट घेतल्याने विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुल सत्तार मुंबईकडे प्रवास करत होते, तर अंबादास दानवे शिर्डीकडे जात होते. याचवेळी समृद्धी महामार्गावर दोघे समोरासमोर आले. अचानक झालेल्या या भेटीत दोघांमध्ये काही काळ संवादही झाला. काल केलेल्या वक्तव्यांनंतर लगेचच दोन्ही नेत्यांची प्रत्यक्ष भेट झाल्याने शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये काही सकारात्मक हालचाली सुरू आहेत का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. या भेटीला आणखी महत्त्व प्राप्त होण्याचे कारण म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना तातडीने मुंबईत बोलावले आहे. या बैठकीसाठीच अब्दुल सत्तार मुंबईकडे रवाना झाले होते. अशा परिस्थितीत मुंबईतील महत्त्वाच्या बैठकीपूर्वी सत्तार आणि दानवे यांची भेट झाल्याने अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. विशेषतः दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर ही भेट अधिकच चर्चेचा विषय ठरली आहे. दरम्यान, भाजपविरोधातील नाराजी उघडपणे व्यक्त केल्यानंतर अब्दुल सत्तार यांना तातडीने मुंबईत बोलावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सत्तार यांच्यासोबत महत्त्वाची बैठक होणार असल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीत समीर सत्तार यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुद्द्यावर तसेच सत्तार यांच्या नाराजीवर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या बैठकीकडे महायुतीतील नेत्यांचे लक्ष लागले आहे. राजकारणात नव्या चर्चांना वेग अब्दुल सत्तार यांनी अलीकडेच भाजपवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. शिवसेनेच्या त्यागाची दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत त्यांनी मित्रपक्षावर निशाणा साधला होता. भाजपने आधी शिवसेनेचे हातपाय तोडले आणि आता थेट अस्तित्वावरच घाव घातल्याचा आरोपही त्यांनी केला होता. दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिवसेनेच्या गोटातही अस्वस्थता वाढल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातील 6 आमदार आणि 1 खासदाराला मुंबईत बोलावले असून स्वतंत्र चर्चा करणार आहेत. त्यामुळे दानवे-सत्तार भेट, सत्तारांची नाराजी आणि मुंबईतील बैठका यामुळे राज्यातील राजकारणात नव्या चर्चांना वेग आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed