शिवसेना पुन्हा एकत्र येणार का?:अब्दुल सत्तारांच्या विधानानंतर रंगलेल्या चर्चांवर एकनाथ शिंदेंची भूमिका; संजय राऊतांचाही टोला
![]()
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान आता शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट पुन्हा एकत्र येणार का, याबाबतही राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजप शिवसेनेला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केल्यानंतर या चर्चांना आणखी वेग मिळाला. त्यानंतर दोन्ही शिवसेना गट पुन्हा एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र या सर्व चर्चांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट प्रतिक्रिया देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांनी विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे यांनी शिवसेना विलीनीकरणाच्या चर्चांना स्पष्ट शब्दांत नकार दिला. आमचीच शिवसेना ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारी संघटना असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच जनतेने दिलेला कौल आणि पाठिंबा आपल्या पक्षाला मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी शिंदे यांनी आपल्या सरकारच्या कामगिरीचाही उल्लेख केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारधारेवर आम्ही ठामपणे चालत आहोत. महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करणारे सरकार आम्ही एकदा नव्हे तर दोनदा स्थापन केले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही जनता शिवसेना, धनुष्यबाण चिन्ह, बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांवर विश्वास ठेवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा राजकीय समीकरण जुळण्याची शक्यता आहे का, या प्रश्नावर त्यांनी थेट उत्तर देणे टाळले. खासदार संजय राऊत यांची टीका दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या चर्चांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटावर निशाणा साधला. खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ही प्रत्यक्षात भाजपचे नेते अमित शहा यांनी निर्माण केलेली एक प्रकारची ‘सिस्टर कन्सर्न’ असल्याचा टोला राऊत यांनी लगावला. त्यामुळे या विषयावर दोन्ही गटांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण अधिक तीव्र झाले आहे. अंबादास दानवे आणि अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यांमधून चर्चा या संपूर्ण वादाची सुरुवात अंबादास दानवे आणि अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यांमधून झाली. अंबादास दानवे यांनी मोठा मासा छोट्या माशाला गिळतो, असे म्हणत भाजप शिवसेनेचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर अब्दुल सत्तार यांनीही भाजपवर टीका करत, शिवसेना ठाकरे गटाचे हात-पाय कापण्यात आले असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तर थेट शिवसेनेचे मुंडकेच छाटले असल्याचे वक्तव्य केले होते. या विधानांमुळे दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांना मोठे बळ मिळाले होते.
