सुप्रिया सुळेंच्या टीकेनंतर पोलिस आयुक्तांचा खुलासा:9 पानांच्या पत्रातून गुन्हेगारी घटल्याचा दावा; जाहीर केली अधिकृत आकडेवारी
![]()
पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असतानाच खासदार सुप्रिया सुळे आणि पुणे पोलिस प्रशासन यांच्यातील वादाला नवे वळण मिळाले आहे. पुणे हे गुन्हेगारांचे केंद्र बनत चालले आहे, असा गंभीर आरोप करत सुप्रिया सुळे यांनी पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी केली होती. या आरोपांना उत्तर देताना अमितेश कुमार यांनी 9 पानांचे सविस्तर पत्र पाठवून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या पत्रात त्यांनी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख कमी होत असल्याचा दावा करत अधिकृत आकडेवारीच समोर ठेवली आहे. पुण्यातील विषारी दारू प्रकरणात 21 जणांचा मृत्यू झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी पोलिस प्रशासनावर तीव्र टीका केली होती. त्यानंतर आयुक्तांनी पत्राद्वारे प्रतिक्रिया देताना विधायक टीकेचे स्वागत असल्याचे सांगितले. मात्र, अपूर्ण किंवा चुकीच्या आकडेवारीमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होतो आणि त्याचा फायदा समाजविघातक प्रवृत्ती घेतात, असे त्यांनी नमूद केले. अशा चर्चांमुळे शहराची प्रतिमा मलिन होते तसेच पोलिस दलाचे मनोबलही खच्ची होते, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. पुण्याची आयटी आणि शिक्षणनगरी म्हणून असलेली ओळख कायम राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. 1 जानेवारी ते 27 मे 2026 या कालावधीतील आकडेवारीचा दाखला देत अमितेश कुमार यांनी अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये घट झाल्याचा दावा केला आहे. त्यांच्या माहितीनुसार, सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये 56 टक्के घट झाली आहे. लुटमार आणि जबरी चोरीचे प्रकार 36 टक्क्यांनी कमी झाले आहेत. वाहन चोरीच्या गुन्ह्यांमध्ये 28 टक्के घट झाली असून खुनाच्या प्रयत्नांच्या घटनांमध्ये 27 टक्के घट नोंदवण्यात आली आहे. घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये 14 टक्के घट झाली असून वाहनांच्या तोडफोडीच्या घटनांमध्ये 50 टक्क्यांहून अधिक घट झाल्याचा दावा करण्यात आला आहे. खुनाच्या गुन्ह्यांबाबतही आयुक्तांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, खुनांच्या घटनांमध्ये 10.5 टक्के घट झाली आहे. वाढलेल्या काही प्रकरणांपैकी 10 गुन्हे हे कौटुंबिक वादातून घडले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पुण्यातील एकूण कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी विविध स्तरांवर सातत्याने उपाययोजना सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोच्या आकडेवारीचा आधार घेत अमितेश कुमार यांनी पुण्याच्या सुरक्षिततेबाबतही दावा केला आहे. देशातील 19 प्रमुख महानगरांमध्ये दखलपात्र गुन्ह्यांच्या प्रमाणानुसार पुणे 18 व्या क्रमांकावर असल्याचे त्यांनी सांगितले. मागील दोन वर्षांत मकोका अंतर्गत 200 गुन्ह्यांमध्ये 1,000 पेक्षा अधिक गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच एमपीडीए कायद्याअंतर्गत 250 जणांवर कारवाई करण्यात आली असून 500 गुन्हेगारांना तडीपार करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. परिस्थिती नियंत्रणात आणल्याचे स्पष्ट केले ड्रग्जविरोधातील मोहिमेचाही आयुक्तांनी विशेष उल्लेख केला आहे. मागील दोन वर्षांत सुमारे 20 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. तर 2024 मध्ये 3,700 कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मे 2026 मध्ये अवघ्या 10 दिवसांत 5 गंभीर घटना घडल्यामुळे गुन्हेगारी वाढल्याचे चित्र निर्माण झाले होते, हे त्यांनी मान्य केले. मात्र त्यानंतर तातडीने गस्त वाढवून परिस्थिती नियंत्रणात आणल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेली अधिसूचना ही ‘लॉकडाऊन’ नसून केवळ अफवा असल्याचे सांगत, रात्री 10 नंतर फक्त तात्पुरत्या टपऱ्या आणि फेरीवाल्यांवर निर्बंध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आता या पत्रानंतर सुप्रिया सुळे कोणती भूमिका घेतात, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
