शेतकऱ्यांकडून पेरणीची तयारी:रासायनिक खते व बियाणांच्या कृत्रिम तुटवड्यावर तपासणीची मात्रा
![]()
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बियाणे व खतांच्या वाढत्या मागणीचा गैरफायदा घेऊन शेतकऱ्यांची आर्थिक लूट होऊ नये, यासाठी बार्शी कृषी विभागाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांच्या नेतृत्वाखाली बार्शी शहरातील विविध कृषी नि विष्ठा (खते, बियाणे व औषधे) विक्री केंद्रांची धडक तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या कारवाईमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. यंदा ‘एल निनो’च्या सावटामुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे कमी कालावधीत येणाऱ्या बियाण्यांची आणि युरिया, डीएपी या खतांची बाजारात मागणी वाढली आहे. याचाच फायदा घेत कृत्रिम टंचाई निर्माण करणे, जादा दराने विक्री करणे किंवा बोगस बियाणे विकणे असे प्रकार घडू शकतात. हे रोखण्यासाठी कृषी विभागाने ही झाडाझडती सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत अधिकाऱ्यांनी दुकानांमधील साठ्याची प्रत्यक्ष तपासणी केली असून, दर्जा तपासण्यासाठी निविष्ठांचे नमुनेही घेतले आहेत. सर्व कृषी सेवा केंद्र – चालकांनी दुकानातील भावफलक आणि साठा फलक दररोज अद्ययावत ठेवावा, शेतकऱ्यांना खरेदीची पक्की पावती द्यावी आणि शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, अशा सक्त सूचना जिल्हा कृषी अधीक्षक भोसले यांनी दिल्या आहेत. या नियमांचे उल्लंघन केल्यास थेट परवाना रद्द करण्यासह कडक कायदेशीर कारवाईचा इशारा दिला. बीज प्रक्रिया करून पेरा पेरणीपूर्वी बियाण्यांची बीज प्रक्रिया केल्यास उगवण चांगली होते. तसेच बुरशी व रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार जैविक किंवा रासायनिक औषधांनी बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी, त्यामुळे कमी पावसातही पिकांची वाढ चांगली राहण्यास मदत होते. कमी पावसात बाजरी, ज्वारी, तूर, मूग, उडीद, तीळ आणि हरभरा ही पिके फायदेशीर ठरतात. ही पिके कमी पाण्यात तग धरतात व नुकसानाचा धोका कमी असतो. कमी पाऊस व पावसातील खंड लक्षात घेता कृषी विभागाने शेतकऱ्यांना कमी कालावधीच्या व दुष्काळ सहन करणाऱ्या बियाण्यांची निवड करण्याचा सल्ला दिला आहे. पेरणी घाईत न करता पुरेसा पाऊस झाल्यानंतरच करावी, असेही आवाहन केले आहे. बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी कमी पावसाच्या परिस्थितीत मिश्रपीक आणि आंतरपीक पद्धती शेतकऱ्यांसाठी सुरक्षित पर्याय ठरू शकतात. तूर व उडीद, सोयाबीन व तूर किंवा ज्वारी व मूग अशी आंतरपिके घेतल्यास एका पिकाचे नुकसान झाले तरी दुसऱ्या पिकातून उत्पन्न मिळू शकते. यामुळे जमिनीतील ओलावा टिकतो आणि धोका कमी होतो.
