मराठी चित्रपट महामंडळ निवडणुकीत अंधश्रद्धेचा प्रकार:कोल्हापुरात मतमोजणी केंद्राबाहेर लिंबू-अंगारा-अगरबत्ती; 14 जागांसाठी 44 उमेदवार रिंगणात
![]()
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान कोल्हापुरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मतमोजणी सुरू होण्यापूर्वी केंद्राबाहेरील एका खुर्चीवर लिंबू, अंगारा आणि अगरबत्ती ठेवण्यात आल्याचे आढळून आले. या घटनेमुळे विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. जवळपास दशकभरानंतर होत असलेल्या या निवडणुकीकडे चित्रपटसृष्टीचे विशेष लक्ष लागले आहे. निवडणुकीपूर्वी उमेदवारी अर्ज, पॅनेल राजकारण आणि विविध आरोप-प्रत्यारोपांमुळे ही निवडणूक आधीच चर्चेत होती. अशातच मतमोजणीच्या दिवशी घडलेल्या या प्रकारामुळे आणखी एक नवा वाद निर्माण झाला आहे. हे साहित्य नेमके कोणी आणि कोणत्या उद्देशाने ठेवले याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 14 जागांसाठी 44 उमेदवार रिंगणात महामंडळाच्या 17 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली असून त्यापैकी तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित 14 जागांसाठी 44 उमेदवार रिंगणात असून समर्थ पॅनल, चित्रकर्मी पॅनल तसेच अपक्ष उमेदवारांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. मुंबई, पुणे आणि कोल्हापूर येथे मतदान पार पडले असून कोल्हापूर केंद्रावर सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे. दरम्यान, या निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप आणि अंतर्गत गटबाजीचे आरोपही समोर आले होते. काही कलाकारांनी निवडणूक प्रक्रियेबाबत नाराजी व्यक्त केली होती, तर काही उमेदवारांच्या नावांवरूनही वाद निर्माण झाला होता. त्यामुळे मतमोजणीपूर्वी घडलेल्या या घटनेने निवडणुकीभोवतीचे गूढ आणि चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहे. मतदानाची टक्केवारी 50 टक्क्यांपेक्षाही कमी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शक वर्गाचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे चित्र दिसून आले. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामांकित व्यक्तींनी मतदान प्रक्रियेकडे पाठ फिरवल्याने मतदानाची टक्केवारी मर्यादित राहिली. मात्र, तंत्रज्ञ, पडद्यामागील कलाकार आणि महामंडळाशी संबंधित सदस्यांनी मतदानासाठी उत्साहाने सहभाग नोंदवला. त्यामुळे चित्रपटसृष्टीतील प्रमुख चेहऱ्यांचा निरुत्साह आणि तांत्रिक विभागातील सक्रिय सहभाग याची चर्चा दिवसभर रंगली. मतदानाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास कोल्हापूर केंद्राने राज्यात सर्वाधिक प्रतिसाद नोंदवला. कोल्हापूर येथे एकूण 746 मतदारांपैकी 517 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. पुण्यातील दोन केंद्रांवर 724 पैकी 460 मतदारांनी मतदान केले, तर मुंबईतील पाच मतदान केंद्रांवर 1569 मतदारांपैकी केवळ 539 जण मतदानासाठी उपस्थित राहिले. याशिवाय सोलापूर केंद्रावर 146 पैकी 63 आणि नाशिक केंद्रावर 219 पैकी 119 मतदारांनी मतदान केले. एकूणच राज्यभरातील मतदानाची टक्केवारी 50 टक्क्यांपेक्षाही कमी राहिल्याने चित्रपटसृष्टीतील सदस्यांच्या सहभागाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
