राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन सोहळा पुढे ढकलला:एनडीएच्या महत्त्वाच्या बैठकीमुळे तारखांमध्ये बदल, 10 ऐवजी 11 जूनला होणार!

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-06-08t194535501_1780928215.jpg




राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा यंदाचा 27 वा वर्धापन दिन एका दिवसाने पुढे ढकलण्यात आला असून, आता हा सोहळा गुरुवार, 11 जून रोजी दुपारी 2 वाजता मुंबईतील किंग्ज सर्कल येथील षण्मुखानंद सभागृहात पार पडणार आहे. दरवर्षी 10 जून रोजी साजरा होणाऱ्या या पक्षीय सोहळ्याच्या तारखेत नवी दिल्लीत ‘एनडीए’ची एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आल्याने बदल करण्यात आला आहे, अशी अधिकृत माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पक्षाची स्थापना 10 जून 1999 रोजी झाली असली तरी, यंदा याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत ‘एनडीए’ घटक पक्षांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला देशभरातील ‘एनडीए’चे सर्व प्रमुख घटक पक्ष, त्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि खासदार उपस्थित राहणार आहेत. महायुती आणि ‘एनडीए’चा एक महत्त्वाचा भाग असल्याने या राष्ट्रीय बैठकीला उपस्थित राहणे आवश्यक आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे 10 जून रोजी दिल्लीतील बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. काय म्हणाले सुनील तटकरे? याबाबत माहिती देताना सुनील तटकरे म्हणाले, देशातील जनतेने सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी आणि एनडीएला देशसेवेची संधी दिली आहे. जगभरात युद्धाचे सावट असतानाही भारताने केलेली प्रगती आणि एनडीए सरकारच्या मागील दोन वर्षांच्या पूर्ततेचा आढावा या बैठकीत घेतला जाईल. तसेच एनडीएच्या भक्कम एकसंघ वाटचालीचे मंथन या बैठकीत होणार आहे. दिल्लीतील बैठक पूर्ण करून सर्व नेते परतल्यानंतर, 11 जून रोजी दुपारी 2 वाजता षण्मुखानंद सभागृहातच हा सोहळा होईल. केवळ तारखेत बदल झाला असून जागा तीच आहे, असे तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. ‘दादांना समर्पण… संघर्ष आणि संकल्प’ सुनील तटकरे म्हणाले, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर पक्ष पहिल्यांदाच आपला वर्धापन दिन साजरा करत आहे. अजित पवारांच्या निधनानंतर अतिशय संयमाने आणि धिरोदत्तपणे पक्षाची धुरा सांभाळत सुनेत्रा पवारांनी राष्ट्रीय अध्यक्षपद आणि राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. हा वर्धापन दिन ‘दादांना समर्पण… संघर्ष आणि संकल्प’ या विचाराने साजरा केला जाणार, अशी माहिती तटकरे यांनी दिली आहे. सुनेत्रा पवार लवकरच राज्यव्यापी दौरा करणार संघटनात्मक बांधणीबाबत बोलताना सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले की, 2029 च्या आगामी मोठ्या आव्हानांना पक्षाला ‘एनडीए’चा घटक म्हणून ताकदीने सामोरे जायचे आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 50 टक्के आरक्षणाबाबतच्या निर्णयानंतर राज्यातील प्रलंबित जिल्हा परिषद निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान होण्याची दाट शक्यता असल्याने, राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांचा राज्यव्यापी दौरा लवकरच नियोजित करण्यात येत आहे. या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, बूथ पातळीपासून ते थेट देशपातळीपर्यंत पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक भक्कम करण्यावर आणि पक्ष विस्तारावर आमचे सर्वोच्च प्राधान्य असेल, असेही तटकरे यांनी यावेळी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *